चिवचिवाट सुरू : नवे मित्र मिळाले, गट्टी जमली अन् खेळ रंगलानागपूर : नवा युनिफॉर्म, नवी पुस्तके, नवे सवंगडी... त्यांच्याशी बोलण्याचा उत्साह, शिक्षकांनी केलेले प्रेमळ स्वागत...व्वा...शाळा अशी असते. खेळण्यासाठी खूप मित्रमैत्रिणी आणि मोठ्ठे मैदान. शाळेची इमारत, खेळण्याची उपकरणे हे सारे पाहून शाळेची संकल्पनाच माहिती नसलेले चिमुकले शाळा पाहून सुखावले. आता रोज शाळेत यायचे आणि मस्त धम्माल करायची, असाच काहीसा विचार असलेल्या चिमुकल्यांच्या हातातला आईचा हात अलगद सुटला आणि मुलांच्या डोळ्यात पाणी तरळले. आईशिवाय शाळा म्हणजे चिमुकल्यांची रडारड. पण प्रेमळ शिक्षकांचा समंजसपणा आणि आपल्यासारखेच अनेक मुले खेळण्यासाठी सोबत पाहून हळूहळू मुलांचे मन शाळेत रमले. कुणी नृत्यात तर कुणी गाण्यात दंग झाले. आईचा नकळत विसर पडला आणि शाळा मुलांच्या दंगामस्तीने फुलल्या. दोन महिने शांत असलेल्या शाळांमध्ये बच्चे कंपनीचा चिवचिवाट आज पुन्हा अनुभवायला मिळाला. शासकीय निर्देशांप्रमाणे शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. विद्यार्थीही नव्याकोऱ्या स्वच्छ गणवेशात नवीन साहित्यासह आॅटो, रिक्षा, सायकल यातून शाळेत पोहोचले. सकाळच्या वेळेस शाळांची प्रार्थना सुरू झाल्यावर वातावरण प्रसन्न झाले होते. त्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम सुरू झाला. शहरातील काही शाळांना स्थानिक नगरसेवकांना स्वागतासाठी बोलाविले. काही शाळांनी सामाजिक कार्यकर्ते, काहींनी शिक्षण तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले. काही शाळांनी सामाजिक संदेश देत प्रभातफेरी काढली. कुठे शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी, शिक्षक व मुख्याध्यापकांनी मुलांना शिस्तीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. प्रवेशोत्सवाच्या सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी अभ्यासाची बाराखडी न गिरवता मुलांना आवडणारे खेळ, गाणी यांचा उपयोग करण्यात आला. त्यानंतर अल्पोपहाराचा कार्यक्रम झाला. कुठे मसालेभात, तर कुठे पोहे, काही ठिकाणी पेढे आणि मिठाईही वाटण्यात आली. एकंदरीतच हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, प्रेरणा देणारा ठरला. शाळेत खाऊ मिळतो म्हणूनही अनेक चिमुकल्यांना शाळेचे आकर्षण वाटले. कुतूहल, औत्सुक्य आणि आकर्षणमिश्रित भाव मुलांच्या चेहऱ्यावर होते. शाळेत जाताना आई-बाबांना सोडण्यासाठी अजिबात तयार नसलेले चिमुकले शाळेतल्या रंजक कार्यक्रमांमध्ये नकळतपणे रमले. पण तत्पूर्वी चक्क तासभर शाळेत मुलांचे रडगाणेच सुरू होते.(प्रतिनिधी)दप्तराला मिळाली सुट्टीअनुदानित शाळांमध्ये आज पुस्तकांचे वाटप करण्यात आले. पहिलाच दिवस असल्याने काही विद्यार्थी रंगीबेरंगी कपड्यातच आले होते. अनेक पालकांनी अद्याप गणवेश घेतलेला नाही. पहिलाच दिवस असल्याने चिमुकले फक्त टिफिन घेऊन गेले. आज दप्तराला सुटी मिळाली होती. पण शाळेतही गणवेशाची सक्ती आज करण्यात आली नाही. पुढचे काही दिवस शाळा कमी वेळात आटोपणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची सवय लागावी, हा त्यामागचा उद्देश आहे. वर्गखोल्यांत चिमुकल्यांचा चिवचिवाटशाळेच्या पहिल्या दिवसाचे महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळेच असते. आई-वडिलांच्या जिव्हाळ्याचा हात सोडून जगाच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व आयुष्यभर पुरणाऱ्या अनुभवांची शिदोरी गोळा करण्याचा श्रीगणेशा याच दिवसाने होतो. उपराजधानीत दोन महिने शांत असणाऱ्या शाळांमध्ये बच्चे कंपनीचा चिवचिवाट पुन्हा अनुभवायला मिळाला.पहिले रडणे, मग बागडणेआज अनेक लहानग्यांचा शालेय शिक्षणाचा पहिलाच दिवस होता. त्यामुळे अनेक शाळांमध्ये त्यांना सोडायला त्यांचे पालक आले होते व शाळांच्या प्रवेशद्वारावरच मुलांचा रडण्याचा कार्यक्रम सुरू होता. मात्र शिक्षकदेखील त्यांना समजावून, खाऊ देऊन शाळेचे आकर्षण निर्माण करीत होते. मुलगा शाळेत गेल्यावर पालकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते. सकाळी शाळेत जाताना रडणारे चिमुकले शाळा सुटल्यावर मात्र छान रमतगमत येताना दिसले.चॉकलेटच्या खाऊने केले काम शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुरड्यांची उडालेली धांदल ... सायकलरिक्षा, आॅटोरिक्षा यांची लगबग... त्यामुळे शाळेचा परिसर एकदम जिवंत झाला होता. डोळ्यात पाणी आणि शेंबूड पुसत पुसत रडकी पोरं एकत्र आली. ओळखीचे चेहरे बघून काहींना धीर आला. पोरांना रडताना पाहून शिक्षकांचीही तारांबळ उडाली. वर्गात आल्यावर तीन-चार शिक्षक चिमुकल्यांना सांभाळण्यासाठी त्यांना गाणे म्हणून दाखवत होते, गोष्टी सांगत होते. हळूहळू चिमुकली वर्गात स्थिरावत गेली. शाळेत कुणीतरी आपली काळजी घेतेय, आपल्यासाठी गाणे म्हणत आहे, हे पाहून मुलांनाही धीर आला. शिक्षकांनी प्रेमाने दिलेल्या फुलांनी आणि चॉकलेटच्या खाऊनेही बाकीचे काम केलेपुस्तक, खाऊचे वाटपजिल्हा परिषद, महानगरपालिकांसोबत शहरातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आकर्षक पद्धतीने स्वागत करण्यात आले. अ़नेक शाळांत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. याशिवाय कुठे चॉकलेट, कुठे मिठाई तर कुठे निरनिराळ्या प्रकारच्या खाऊचे शाळांतर्फे वाटप झाले.शाळा थोड्या वेळासाठीच आईला सोडून वर्गात जाणे, शाळेत स्वतंत्रपणे जाणे चिमुकल्यांच्या छोट्याशा भावविश्वाला हादरा देणारे होते. त्यामुळे अनेक मातांना गहिवरून आले. पोरांचा आकांत त्यांना अस्वस्थ करणारा होता पण शाळेत तर जायलाच हवे. मुलांना शाळेची शिस्त लागावी म्हणून मातांनीही कठोरतेने त्यांचा हात सोडला. पण मुले शाळेत असेपर्यंत अनेक पालक शाळेबाहेर उभे होते. आज पहिलाच दिवस असल्याने लहान मुलांची शाळा १ तासाचीच ठेवण्यात आली होती. अनेकांना झाला उशीर आज शाळेचा पहिलाच दिवस होता. बहुतेक पालकांनी मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी आॅटो आणि रिक्षांची व्यवस्था केली आहे. पण पहिल्याच दिवशी मुलांना स्वतंत्रपणे पाठविण्याचे धाडस मात्र काही पालकांनी केले नाही. त्यामुळे साऱ्या धावपळीत पालकच आज मुलांना घेऊन शाळेत आले. त्यात अनेकांना थोडा उशीरही झाला. पण पहिला दिवस असल्याने शाळा व्यवस्थापनानेही उशीर मान्य केला. लहान मुले रडत असल्याने पाल्यांकडे लक्ष द्यावे, त्याची काळजी घ्यावी, अशी विनंती पालकांनी शिक्षकांना केली. त्यात बऱ्याच पालकांनी आज पाल्यांना पुस्तकाशिवाय पाठविले.‘ट्रॅफिक’मुळे खोळंबाशाळेचा पहिलाच दिवस असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे आॅटोचालक आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडायला पालकांनाच यावे लागले. शिवाय पहिल्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना सोडायला दुचाकी-चारचाकीतून पालक आले होते. त्यामुळे खामला, देवनगर, रामदासपेठ, धरमपेठ, प्रतापनगर इत्यादी भागात शाळांसमोर ‘ट्रॅफिक जॅम’ झाल्याचे दिसून आले. विशेषत: वर्धा मार्गावर सकाळच्या वेळी वाहनांची कोंडी झाली होती.
पहिल्याच दिवशी चिमुकल्यांची धम्माल!
By admin | Updated: June 27, 2015 03:17 IST