नागरिकांचे आरोग्य धोक्यात : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारबुटीबोरी : स्थानिक औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा आणि कृष्णा नदीत सोडण्यात आल्याने बुटीबोरी व टाकळघाट येथील नागरिक तसेच नदीच्या पात्रातील जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. बुटीबोरी व टाकळघाट या दोन्ही गावांना वेणा आणि कृष्णा नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही नदीच्या पात्रात इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याने, या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, या गावांमधील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रीतसर तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण मंडळाच्या सदस्यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी केली.दरम्यान, प्रदूषण मंडळाचे अधिकारी लोहळकर यांनी या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाण्याचे नमुने घेतले. सदर नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे लोहळकर यांनी सांगितले. सदर रसायनयुक्त पाणी नदीच्या पात्रांत सोडणे बंद करावे, अशी सूचना प्रदूषण मंडळाच्या सदस्यांनी कंपनी व्यवस्थापनाला केली होती. परंतु दुसऱ्या दिवशीही विशेष म्हणजे, रसायनयुक्त पाणी पात्रात सोडणे सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी या प्रकाराबाबत एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक वैरागडे यांनी एमआयडीसीचे उपअभियंता राय व व्यास यांना बोलावून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी रसायनयुक्त पाणी सोडले जाते, त्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला आणि इंडोरामा कंपनी व्यवस्थापनावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. असाच प्रकार यापूर्वीही घडला होता. त्यावेळी प्रदूषण मंडळाने या कंपनीवर दंड ठोठावला होता. (प्रतिनिधी)
रसायनयुक्त पाणी नदीत
By admin | Updated: November 18, 2016 03:09 IST