पॅरामिल्ट्री फोर्सेसही लागणार : नक्षलग्रस्त भागात ३ वाजेपर्यंतच राहणार मतदानगडचिरोली : या नक्षलग्रस्त जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान राहणार आहे. नक्षलवाद्यांचा लोकशाही प्रक्रियेला विरोध असून त्यांनी यावेळी मतदानावर बहिष्कार घालण्याचे आव्हान पत्रकाद्वारे केले आहे. जिल्ह्याच्या अनेक दुर्गम भागात हे पत्रक टाकले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तसेच मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. दुसरीकडे प्रशासनाने नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ ठेवली असून मोठ्या प्रमाणावर मतदान व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. तीन विधानसभा क्षेत्रात प्रशासनाने निवडणूक एक्सप्रेस नावाचा रथही जनजागृतीसाठी तयार केला आहे. जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीन विधानसभा मतदार संघात एकूण ८९३ मतदान केंद्र आहेत. यापैकी १८३ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत. तर २३४ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. अतिसंवेदनशिल मतदान केंद्रांमध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्रातील ६१, गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील २५ व अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वाधिक ९७ मतदान केंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर गडचिरोली जिल्हा पोलीस दलाचे शेकडो जवान तसेच राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल यांचेही तेवढेच जवान तैनात करावे लागतात. मतदान केंद्रापासून १५ ते २० किमी अंतरावरून मतदारांना येथे मतदानासाठी आणावे लागते. यंदा गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी वाहनाचीही व्यवस्था केली आहे.बुलेटला बॅलेटने उत्तर देण्यासाठी गडचिरोली पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घातपाताच्या घटना घडविण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे वेळीही अहेरी तालुक्यात बेस कॅम्पवरून पोलींग पार्टी परत आणताना नक्षली हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. यावेळी नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे काही मतदान केंद्र ऐनवेळी बदलविले जाऊ शकतात, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)
नक्षल्यांच्या दहशतीत मतदान प्रक्रियेचे पोलिसांसमोर आव्हान
By admin | Updated: September 23, 2014 01:03 IST