नागपूर : प्रभागात पाणी येत नाही म्हणून सामान्य नगरसेवक ओरड करीत असतानाच भाजपचे प्रतोद व लक्ष्मीनगर झोनचे सभापती असलेले गोपाल बोहरे यांनाही पाण्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे. आरपीटीएस प्रभागात सुरेंद्रनगर भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे बोहरे संतापले. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सुनावले. शेवटी रात्री ९ च्या सुमारास लक्ष्मीनगर टाकीवर पोहोचले व प्रभागात पाणी मिळाल्याशिवाय येथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेत तेथेच ठाण मांडून बसले. उन्हाळ्यात शहरातील बहुतांश भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे राजकीय नेत्यांनी पाण्यासाठी मोर्चे काढले नाही. नगरसेवकांनी ओरड केली, पण कुणी ऐकून घेतले नाही. आता सत्ताधारी सभापतींनाही याचा फटका बसत आहे. प्रभागात पाणी न मिळाल्यामुळे संतापलेले सभापती बोहरे रात्री ९ वाजता लक्ष्मीनगर टाकीवर पोहोचले. त्यांनी ओसीडब्ल्यूच्या सर्व अधिकाऱ्यांना मोबाईल करून बोलावले. अधिकारी आल्याशिवाय आपण टाकीजवळून हटणार नाही, येथेच उपोषण करू, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. ओसीडब्ल्यूचे अभियंता गोलाईत पोहोचले. अभियंता शाहदाद यांनी तर फोनही उचलला नाही. लोकमतशी बोलताना बोहरे म्हणाले, ओसीडब्ल्यूला उन्हाळ्यात युद्धपातळीवर काम करायचे होते. मात्र दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. सुरेंद्रनगर भागात गेल्या चार दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा झालेला नाही. काही ठिकाणी जलवाहिनी फुटली असल्याचे कारण समोर करीत पाणीपुरवठा बंद केला आहे. अधिकारी फोन उचलत नाही. एकमेकांकडे टोलवाटोलवी करतात. कर्मचाऱ्यांना तर नगरसेवकांची बोलण्याची पद्धत माहीत नाही. उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची कामे उरकण्यासाठी सुट्या बंद केल्या जातात. मात्र ओसीडब्ल्यूने कर्मचाऱ्यांना सुट्या दिल्या आहेत. ओसीडब्ल्यूचा अनागोंदी कारभार सुरू असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.(प्रतिनिधी)
सभापती बोहरे भडकले - रात्रीच टाकीवर पोहोचले
By admin | Updated: July 3, 2014 00:48 IST