महाकवी सुधाकर गायधनी यांना राज्यस्तरीय द्वितीय काव्य पुरस्कार : अक्षरक्रांती प्रतिष्ठानचे आयोजन नागपूर : राज्यस्तरीय काव्य पुरस्कारात राज्यातील प्रतिभावंत कवींना पुरस्कार प्रदान करताना वैद्यकीय क्षेत्रातील निष्णात, तज्ज्ञ डॉक्टरांनाही पुरस्कृत करण्यात यावे, हा प्रसंग तसा विरळाच. कवी मानवी जगण्याच्या संवेदना मांडतो आणि डॉक्टर्स या संवेदना जपण्यासाठी आरोग्य प्रदान करतात. दोन्ही क्षेत्रात संवेदना असल्याशिवाय काम होत नाही. एखाद्या दुर्धर, कठीण रोगातून प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णाला जीवनदान देणाऱ्या डॉक्टरांचे उपचार म्हणजे त्यांनी जगलेली कविताच असते. तर कविता येण्यासाठी प्रतिभावंतालाही प्रसववेदना असतात. त्यामुळे डॉक्टर आणि कवींच्या संबंधात संवेदनशीलता हा समान धागा आहे. शुक्रवारी एका कार्यक्रमात हा समसमा योग रसिकांना अनुभवता आला. अक्षरक्रांती प्रतिष्ठानच्यावतीने महाकवी सुधाकर गायधनी राज्यस्तरीय द्वितीय काव्य पुरस्कार प्रदान समारंभाचे आयोजन विदर्भ हिंदी साहित्य संमेलनातील अर्पण सभागृहात करण्यात आले. याप्रसंगी कवी इंद्रजित घुले, कवयित्री अश्विनी नरड आणि कवी गणेश पांडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. संजय नाथे तर प्रमुख अतिथी म्हणून गणिततज्ज्ञ डॉ. टी. एम. करडे, हृद्यरोगतज्ज्ञ डॉ. निकुंज पवार, अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ. अनिल गोल्हर, महाकवी सुधाकर गायधनी, नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे उपस्थित होते. हा कार्यक्रम सुधाकर गायधनी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आला. याप्रसंगी सर्व अतिथींनी गायधनी यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सपत्निक सत्कार केला. गायधनी यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. गोल्हर आणि डॉ. पवार यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी करडे म्हणाले, गणितीय सिद्धांतानुसार महाकवींच्या जन्माने आजचा दिवस धन्य झाला. गायधनी यांच्या महावाक्यमध्ये त्यांनी व्यवस्थेविरुद्ध पेटून उठण्याची आणि सर्वांनी एकत्रितपणे व्यवस्था उलटवून टाकण्याची दिलेली ललकारी त्यांचेच गुरु संत तुकारामांची आठवण करून देणारे आहे.डॉ. गोल्हर म्हणाले, गेली २५ वर्षे कुष्ठरोग्यांची सेवा करीत आहे. कुष्ठरोग्यांना हात लावायलाही कुणी धजावत नाही पण गेल्या २५ वर्षात १६०० रुग्णांवर नि:शुल्क शस्त्रक्रिया केली.डॉ. पवार यांनीही सत्कारापेक्षा मागे राहून काम करीत राहणे जास्त महत्त्वाचे वाटते. आपल्यापेक्षा आपले काम बोलले पाहिजे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी सुधाकर गायधनींनी काही कविता सादर केल्या. पुररस्कारप्राप्त कवींनीही मनोगत व्यक्त केले. संचालन माला पारधी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षरक्रांतीचे राम धोंडे, शंकर घोरसे यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
डॉक्टर्स आणि कवींच्या सन्मानाने रंगला सोहळा
By admin | Updated: September 19, 2015 03:54 IST