नागपूर : राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची घोषणा केल्याने जिल्ह्याचा शांत झालेला राजकीय माहोल पुन्हा गरम होणार आहे. राजकीय पक्षाचे उमेदवार लढण्यास तयार आहेत. रणनीतीही निश्चित आहे. आता फक्त संघर्ष बाकी आहे. ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या काळात येत्या २२ दिवसात उमेदवारांना जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचायचे आहे.
दरम्यान, काही उमेदवारांनी दोन महिन्याच्या मिळालेल्या कालावधीचा सदुपयोग केला आहे. त्यांनी आपला जनसंपर्क सर्कलमध्ये चांगला वाढविला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या ओबीसी प्रवर्गातील १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. नियमानुसार तीन महिन्याच्या आत निवडणुका घ्यायच्या असल्याने निवडणूक आयोगाने जून २०२१ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. उमेदवारी अर्जाची छाननीदेखील झाली होती. फक्त वैध उमेदवाराची यादी निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध व्हायची होती. पण कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता, निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिली. सोमवारी निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने आता पुन्हा राजकीय वातावरण रंगणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार ९ जुलैपर्यंत झालेली प्रक्रिया कायम ठेवण्यात आली आहे. आता २१ सप्टेंबर रोजी निवडणूक विभाग वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणार आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ व पंचायत समितीच्या ३१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांमध्ये ७ जागा काँग्रेसच्या आहेत. चार राष्ट्रवादी, चार काँग्रेस व एक शेकापची जागा आहे. काँग्रेसने एक जागा वगळता सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवाराला अथवा त्यांच्या कुटुंबीयालाच उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीनेही उमेदवारी देताना केवळ एक बदल केला आहे. भाजपाने सदस्यत्व रद्द झालेल्या चारही उमेदवाराला पुन्हा उमेदवारी दिली आहे. पण गुमथळा सर्कलमध्ये झालेल्या बंडखोरीने भाजपाचे कमळ चिन्ह गोठविण्यात आले आहे.
- बंडखोरीची लागण, शिवसेनेची डोकेदुखी
गुमथळा, येनवा, सावरगाव, गोधनी, राजोला या सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे, तर शिवसेनेने १६ जागांपैकी १२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. जिल्हा परिषदेत झालेल्या आघाडीत शिवसेना केवळ नावाचीच आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आपले अस्तित्व वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्याच उमेदवारांची डोकेदुखी वाढविणार आहे.
- जिल्हा परिषदेसाठी १०३ व पंचायत समितीसाठी १६० उमेदवारांचे अर्ज
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी जून महिन्यात जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषदेसाठी १०३ व पंचायत समितीसाठी १६० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. ६,१६,०१६ मतदार या पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.