महापालिका : १५०० ते १६०० कोटीचे नियोजन?नागपूर : महापालिकेचा २०१५-१६ या वर्षाचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्प कमी रकमेचा राहणार असल्याचे संकेत आहे. २०१४-१५ या वर्षाचा अर्थसंकल्प १६४५ कोटीचा होता. यंदा १५०० ते १६०० कोटीचे नियोजन केले जाणार आहे.आयुक्तांनी १२५४ कोटीचा प्रस्तावित अर्थसंकल्प दिला आहे. त्या तुलनेत स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे २५० ते ३०० कोटींचा वाढीव अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एलबीटी आॅगस्टपासून रद्द होणार आहे. परंतु पर्याय अद्याप निश्चित नसल्याने अर्थसंकल्पात एलबीटीपासून ६०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत विचारात घेता प्रशासनाला ९०० कोटीचे उत्पन्न अपेक्षित आहे. परंतु स्थायी समिती परंपरेनुसार यावेळी सुद्धा वाढीव अर्थसंकल्प मांडणार आहे. गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सिमेंट रस्त्यासाठी ९० कोटीची तरतूद करण्यात आली होती. परंतु एलबीटीमुळे हा निधी उपलब्ध करताना अडचणी आल्या. सिमेंट रस्त्यासाठी सरकारकडून ३०० कोटी मिळाल्याने अर्थसंकल्पावर याचा भार राहणार नाही.मनपाने जेएनएनयूआरएम योजनेंर्तगत हाती घेतलेल्या प्रकल्पासाठी भरीव तरतूद करावी लागणार आहे. तसेच लाडली लक्ष्मी योजना, स्मशानघाटाचा विकास, रस्ते, पूल व अर्धवट प्रकल्पांसाठी तरतूद करावी लागणार आहे. परंतु उत्पन्न विचारात घेता तरतूद करताना अध्यक्षांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. सोबतच नवीन घोषणा अपेक्षित आहे. त्यामुळे बीओटीवर प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या आठवड्यात
By admin | Updated: May 25, 2015 02:44 IST