पशूपासून मानवाला संसर्ग : संपूर्ण राज्यात राबविणार लसीकरण मोहीम
सुरेंद्र राऊत - यवतमाळ
गाय-म्हैस या पाळीव पशूंमध्ये बु्रसेल्ला हा घातक जिवाणू आढळल्याने भीती निर्माण झाली आहे. या जिवाणूचा संसर्ग मानवाला झाल्याचे प्रकार पुढे येत आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांमध्ये याचा संसर्ग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात केवळ दोन टक्के प्रमाण असले तरी संभाव्य धोका ओळखून लसीकरण मोहीम राबविली जात आहे. आतापर्यंत बर्ड फ्लू हाच एक कोंबडीपासून पसरणारा आजार माहीत होता. मात्र आता पाळीव जनावरांपासूनसुध्दा माणसाला संसर्ग होत असल्याचे दिसून येते. रॅबीजपेक्षाही भयंकर समजल्या जाणार्या ब्रुसेल्ला या जिवाणूची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. या जिवाणूचा वाहक असलेल्या गाय, म्हैस यांच्या प्रसूतीनंतर बाहेर पडणारा गाभ व जाळातून याचा संसर्ग होतो. ग्रामीण भागात गाईची प्रसूती करताना उघड्या हातानेच हा जाळ काढण्यात येतो. हाताला जखम असल्यास आणि चुकून न यातील काही द्रव्य डोळ्यात, नाकात उडाल्यास संसर्ग होण्याची भीती राहते. या जिवाणूचा संसर्ग एका वाहक पशूकडून दुसर्या पशूला होऊ शकतो. स्त्रियाही या जिवाणूच्या वाहक असू शकतात. संसर्ग झाल्यानंतर वारंवार ताप येतो. हा जिवाणू मज्जातंतूत शिरल्यास अर्धांगवायूचा झटका येण्याची भीती असते. गडचिरोली जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात काम करणारे अधिकारी व कर्मचार्यांच्या रक्त नमुन्यांची तपासणी केली असता २५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. यवतमाळ जिल्ह्यात दोन टक्के नमुने पॉझिटिव्ह आले. उमरखेड येथील पशुसंवर्धन अधिकार्यास अर्धांगवायूचा झटका आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने योग्य दक्षता घ्यावी असे, निर्देश देण्यात आले आहेत. गाय किंवा म्हशीची प्रसूती झाल्यानंतर पशुपालक निघणारा गाभ, जाळ चुकीच्या पध्दतीने हाताळतात, बरेचदा तो गोठ्यातच पसरून राहतो. त्याला खोल खड्डा करून जमिनीत पुरणे आवश्यक आहे. जे जनावर ब्रुसेल्ला जिवाणूचे वाहक आहे त्याचा वारंवार गर्भपात होतो. यावर कोणातच ठोस उपचार नाही. त्यामुळे जिवाणूचा संसर्ग होऊ नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी चार ते १२ महिन्याच्या कालवडी आणि वगारींना याची प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. संपूर्ण देशातच हा कार्यक्रम राबविला जात आहे. या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण गुजरात, राजस्थान या राज्यात अधिक आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी गावठी पध्दतीने गाय, म्हैस फळविण्याऐवजी शेतकर्यांनी कृत्रिम रेतन पध्दतीचा अवलंब करावा असे आवाहन पशुसंवर्धन अधिकार्यांनी केले आहे. बु्रसेला जिवाणूच्या संसर्गाची लक्षणे वारंवार ताप येतो. मनुष्याच्या अंडकोषावर सूज येते. महिलांमध्ये गर्भपात होतो. काही कालावधीनंतर अर्धांगवायूचा झटका येण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे हा जिवाणू मानवी प्रयोगशाळेतील तपासणी सहसा आढळून येत नाही. नवीनच असल्याने बर्याच डॉक्टरांना याची माहिती नाही.