सेतू केंद्रात विशेष पथकाची कारवाई : वकिलांचाही समावेशनागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाने आकस्मिक भेट देऊन तेथील दलालांची धरपकड केली. अचानक झालेल्या कारवाईमुळे केंद्रातील दलालांची पळापळ झाली. त्यात काही वकिलांचाही समावेश होता. पथकाने तिघांना पकडले असून, त्यांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर सेतू केंद्रात गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेऊन बाहेरचे दलालही सक्रिय झाले आहेत. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या सूचनेनुसार आकस्मिक कारवाईसाठी चार विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्याकडे सेतू केंद्रातील वाईट प्रकारांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गुरुवारी अधीक्षक राजेश पोहनकर यांच्या नेतृत्वाखालील चार जणांच्या पथकाने दुपारी सेतू केंद्राला भेट दिली. या पथकाला केंद्रात सात जणांकडे आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली. त्यांची तपासणी केली असता ते सेतू केंद्रातील कागदपत्रे असल्याची आढळून आली. तपासणी सुरू होताच केंद्रात पळापळ सुरू झाली. सातपैकी तीन जण पथकाच्या हाती लागले. त्यात पुरुषोत्तम हटवार, आशिष हांडे आणि सतीश माळी यांचा समावेश आहे. त्यांना सदर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. उर्वरितांनी कागदपत्रे टाकून पळ काढला. पथकाची कारवाई पुढच्या काळात रोज होणार असल्याचे पोहनकर यांनी सांगितले.सेतू केंद्रात वकिलांचे काम काय?सेतू केंद्रात वकिलांचे काम काय, असा सवाल प्रशासनाने केला आहे. वकिलांनी न्यायालयात जावे. मात्र ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सायकल स्टॅन्डवर बसतात. आकस्मिक तपासणीच्या वेळी त्यांच्याजवळ केंद्रातील कागदपत्रेही सापडली आहेत. हा प्रकार गंभीर आहे. सायकल स्टॅन्डवर गेल्यावर तेथील दलाल नागरिकांना घेरून घेतात. विशेष म्हणजे केंद्रात आणि बाहेरही पोलीस तैनात असताना दलाल येथे सक्रिय आहेत.(प्रतिनिधी)
दलालांची धरपकड
By admin | Updated: June 13, 2014 01:24 IST