गर्दी कमी झाली : कामकाजात आली सुसूत्रतानागपूर : परिवहन आयुक्त महेश झगडे यांच्या आदेशानंतर दलालांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नाला तूर्तास तरी यश मिळाले आहे. परंतु तोकड्या मनुष्यबळामुळे या यशावर संशय व्यक्त केला जात आहे. कार्यालयातून दलाल हद्दपार झाल्याने कामकाजात सुसूत्रता आली आहे. गर्दी कमी झाल्याने कामाचा वेगही वाढल्याचे चित्र आहे. परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार दलालांना सोमवारपासून कार्यालयाच्या बाहेर ठेवण्यात येत आहे. यासाठी आरटीओने पोलिसांची मदत घेतली आहे. सोबतच मोटार वाहन सहायक निरीक्षकांवरही याची जबाबदारी देण्यात आली आहे. परिणामी आरटीओ गेटवर प्रत्येकाला त्याच्या कामाची चौकशी करून पुढे सोडले जात आहे. दलालांचा हस्तक्षेप नसल्याने आरटीओत गुरुवारी देखील सुटसुटीतपणा आला होता. दिवसभर आरटीओ परिसरात शांतता दिसत होती. कधी नव्हे ते इतक्या शिस्तीत बुधवारी रांगा लागलेल्या होत्या. दलाल नसल्याने स्वत: अर्जदाराला उपस्थित रहावे लागत आहे. नव्या नियमांमुळे वाहनचालक, मालक स्वत:च आपली कामे करण्यासाठी पुढे येत आहेत. यात फक्त ट्रेड सर्टिफिकेट असलेल्यांनाच सूट देण्यात आली आहे. ड्रायव्हिंग स्कूल, वाहन विक्र ेते आणि वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांना ही सवलत आहे. त्यांच्याकडून कागदपत्रे स्वीकारली जात आहेत.(प्रतिनिधी)आरटीओच्या उत्पन्नात फरक नाहीउपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले, दलालांना बाहेर काढण्यात आले असलेतरी आरटीओला मिळणाऱ्या महसुलामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. वाहन नोंदणीची संख्याही घसरलेली नाही.
आरटीओत दलालांना ब्रेक
By admin | Updated: January 25, 2015 00:52 IST