‘व्हीएनआयटी’त ‘एनएसयूआय’ कार्यकर्त्यांकडून निषेध : पोलीस सुरक्षेतील त्रुटी उघडनागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच संघभूमीतील सार्वजनिक कार्यक्रमात आलेल्या स्मृती इराणी यांना ‘एनएसयूआय’ (नॅशनल स्टुडन्ट्स युनिअन आॅफ इंडिया) व युथ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणासंदर्भात त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. संपूर्ण परिसरात प्रचंड सुरक्षाव्यवस्था असूनदेखील स्मृती इराणी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी काही फुटांपर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांनी हा निषेध केला. यामुळे पोलीस सुरक्षेतील मोठी त्रुटी समोर आली आहे.‘व्हीएनआयटी’ येथे गुरुवारपासून संशोधनासाठी पुनरुत्थान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेची सुरुवात झाली. या परिषदेच्या उद्घाटनासाठी स्मृती इराणी दुपारी ३ च्या सुमारास ‘व्हीएनआयटी’ येथे पोहोचल्या. यावेळी ‘व्हीएनआयटी’च्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर ‘एनएसयूआय’ कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले व त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरले व इराणी यांच्या वाहनांचा ताफा आत गेला. काही वेळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील तेथे पोहोचले व दोघेही ४.४५ वाजता कार्यक्रम सभागृहाकडे निघाले. सभागृहासमोरील मोकळ्या मैदानातून पायी जात असताना उपस्थितांच्या गर्दीतून अचानक काही कार्यकर्ते त्यांच्या जवळ आले व इराणी यांच्या विरोधात घोषणा देऊ लागले. अचानक झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेतील अधिकारी व कर्मचारीदेखील गोंधळले. परंतु लगेच सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. झालेल्या प्रकाराबाबत स्मृती इराणी यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु निषेध करणाऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)...ते समाजकंटक असते तर !स्मृती इराणी यांच्या दौऱ्यादरम्यान असा प्रकार होऊ शकतो याची पोलीस प्रशासनाला माहिती होती. आयोजकांनादेखील याची कल्पना देण्यात आली होती. परंतु सुरक्षेबाबत हवी ती काळजी घेण्यात आली नाही. युथ काँग्रेस, ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी अहिंसात्मक पद्धतीने निषेध करण्याचे ठरविले होते व त्यानुसारच त्यांनी घोषणाबाजी केली. परंतु जर या कार्यकर्त्यांऐवजी कुणी समाजकंटक येथे पोहोचले असते तर स्मृती इराणी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असता. इतकी मोठी चूक कशी काय झाली यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडे काहीही उत्तर नव्हते.
संघभूमीत स्मृती इराणी यांना दाखविले काळे झेंडे
By admin | Updated: February 12, 2016 03:30 IST