काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकविण्यात शिवसेनेला यश आले. भाजपने पूर्ण ताकदीनिशी ताणून धरणेला ‘बाण’ शिवसेनेच्या धनुष्यातून असा सुसाट सुटला की केंद्रात मंत्री राहिलेले व राहुल ब्रिगेडच्या गोटात वावरणारे खा. मुकुल वासनिक यांना घायाळ करून सोडले. गेल्यावेळी थोड्या मतांनी हरलेले शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी यावेळी काँग्रेसचे वासनिक यांना तब्बल १ लाख ७५ हजार ७९१ मतांनी पराभूत केले. बसपाच्या किरण पाटणकर या ९५ हजार ५१ मते घेत तिसर्या तर ‘आप’चे प्रताप गोस्वामी हे २५ हजार ८८९ मतांसह तिसर्या क्रमांकावर राहिले. गेल्यावेळी तुमाने शिवसेनेत वेळेवर दाखल झाले होते. त्यामुळे पक्षांतर्गत दगाफटका झाला. या वेळी मात्र, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना ठणकावत कामाला लावले होते. नागपुरात गडकरी रिंगणात असल्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातही भाजप कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता. अतवृष्टी, डबघाईस आलेली जिल्हा बँक यामुळे शेतकर्यांचा काँग्रेसवर रोष होता.
की फॅक्टर काय ठरला?
मुकुल वासनिक मंत्री असताना दिल्लीतच रमले, मतदारसंघात फिरकले नाहीत, असा त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या प्रचार मतदारांच्या मनाला भिडला. गेली निवडणूक हरल्यानंतर तुमाने हे सतत मतदारसंघाच्या संपर्कात राहिले. याचेच त्यांनी भांडवल केले.
शिवसेनेसाठी भाजपने शक्ती पणाला लावली. त्यातुलनेत काँग्रेस कार्यकर्ते सक्रीय दिसले नाहीत. राष्ट्रवादीही फक्त सभा, बैठका घेण्यापुरतीच दिसत होती. निवडणूक यंत्रणा पाहिजे तशी राबली नाही. वासनिकांनी केलेल्या कामांच्या मार्केटिंगमध्ये काँग्रेस नेते कमी पडले.