लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदांसाठी गुरुवारी (दि. ११) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात सहा ग्रामपंचायतींवर भाजपसमर्थित गटाने, तर तीन ग्रामपंचायतींवर काॅंग्रेससमर्थित गटाने सत्ता प्रस्थापित केली. कोराडी, लोणखैरी, घोरपड, पवनगाव, खेडी व भामेवाडा या सहा ग्रामपंचायती भाजपसमर्थित गटाकडे, तर टेमसना, महालगाव व केशोरी या तीन ग्रामपंचायती काँग्रेससमर्थित गटाकडे गेल्या आहेत.
काेराडी ही कामठी तालुक्यातील माेठी व महत्त्वाची ग्रामपंचायत असून, येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले हाेते. येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केले हाेते. येथे सरपंचपदी भाजपसमर्थित गटाचे नरेंद्र धानाेले यांनी काॅंग्रेससमर्थित गटाच्या निर्मला वीरखेडे यांचा १३ विरुद्ध ४ मतांनी पराभव केला. या ग्रामपंचायतीवर भाजपसमर्थित गटाचे १२, तर काॅंग्रेससमर्थित गटाचे पाच सदस्य निवडून आले आहेत. काॅंग्रेससमर्थित गटाचे एक मत फुटून ते नरेंद्र धानाेले यांना मिळाल्याने काॅंग्रेस गटात खळबळ उडाली हाेती. लाेणखैरी येथे काॅंग्रेसला रामराम ठाेकून भाजपसमर्थित गटात सामील झालेले लीलाधर भोयर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
पवनगाव येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव केले हाेते. येथील सरपंचपदी भाजयुमाेचे कामठी तालुकाध्यक्ष किरण राऊत यांच्या पत्नी नेहा राऊत, तर उपसरपंचपदी रामचंद्र रेवाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या ग्रामपंचायतीवर आधीपासूनच भाजपसमर्थित गटाचे वर्चस्व आहे. खेडी येथील सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित केले हाेते. येथील सरपंचपदी भाजपसमर्थित गटाच्या भारती देवगडे, तर उपसरपंचपदी नामदेव ठाकरे यांची वर्णी लागली. दाेघेही बिनविराेध निवडून आले. या ग्रामपंचायतीवरील वर्चस्व कायम राखण्यात भाजपसमर्थित गटाला याहीवेळी यश आले.
टेमसना येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित हाेते. येथील सरपंचपदी काँग्रेससमर्थित गटाचे अनिकेत शहाणे व उपसरपंचपदी रामभाऊ खडसन बिनविरोध निवडून आले. ही ग्रामपंचायत ५० वर्षांपासून काँग्रेस गटाच्या ताब्यात असून, वर्चस्व कायम ठेवण्यात माजी सभापती पुरुषोत्तम शहाणे व जिल्हा परिषद सदस्या अवंतिका लेकुरवाळे यांना यश आले. महालगाव-आसोली गट ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित केले हाेते. येथील सरपंचपदी काँग्रेससमर्थित गटाचे प्रकाश गजभिये बिनविरोध निवडून आले. येथे भाजपसमर्थित गटाकडे या प्रवर्गातील उमेदवार नसल्यामुळे सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली. उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेससमर्थित गटाच्या निर्मला इंगोले यांनी भाजपसमर्थित गटाचे अंताराम ठाकरे यांचा एक मताने पराभव केला. निर्मला इंगाेले यांना पाच , तर अंताराम ठाकरे यांना चार मते मिळाली.
.....
घाेरपड, भामेवाडा, केसाेरी येथे परिवर्तन
घोरपड येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित केले हाेते. येथील सरपंचपदी भाजपसमर्थित गटाच्या तारा कडू, तर उपसरपंचपदी अनिकेत वानखेडे यांची अविरोध निवड करण्यात आली. ही ग्रामपंचायत १० वर्षांपासून काॅंग्रेससमर्थित गटाच्या ताब्यात हाेती. भामेवाडा येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव केले हाेते. येथे सरपंचपदी भाजपसमर्थित गटाच्या सविता फुकट, तर उपसरपंचपदी रतन ओके यांनी विजय संपादन केला. ही ग्रामपंचायत २५ वर्षांपासून काॅंग्रेससमर्थित गटाकडे हाेती. यावेळी येथे परिवर्तन घडवून आणण्यात भाजप नेत्यांना यश आले. केसोरी येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केले हाेते. येथील सरपंचपदी काँग्रेससमर्थित गटाचे प्रकाश महाकाळकर व उपसरपंचपदी सोपान वानखेडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही ग्रामपंचायत पाच वर्षांपूर्वी भाजपसमर्थित गटाच्या ताब्यात हाेती.
...
महालगाव येथे भाजप गटाला धक्का
महालगाव-आसाेली येथील उमेदवार प्रवीण धांडे यांनी आत्महत्या केल्याने ११ पैकी एक जागा रिक्त आहे. यात काँग्रेससमर्थित गटाला चार, भाजपसमर्थित गटाला तीन व भाजपसमर्थित बंडखोर अंताराम ठाकरे यांच्या गटाला तीन जागा मिळाल्या हाेत्या. या निवडणुकीत जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते अनिल निधान यांच्या गटाला जबर धक्का बसला. उपसरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांनी जुळवाजुळव करून बंडखोर अंताराम ठाकरे यांच्याशी जुळवून घेतले हाेते. परंतु, त्यांच्याच गटातील चैताली उरकुडे या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत गैरहजर राहिल्या. त्यामुळे काँग्रेससमर्थित गटाच्या निर्मला इंगोले यांचा उपसरपंच पदाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. त्या गैरहजर नसत्या तर उपसरपंच पदासाठी ईश्वरचिठ्ठीने आधार घ्यावा लागला असता.