- डॉ. विमल थोरात : डॉ. कल्पना शास्त्री व जेबुन्निसा शेख यांना ‘ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुधारणावादी महिलांना कोणत्याही संकटाची आता सवय झाली आहे. मात्र, पुढे येणाऱ्या धोक्यासाठी त्यांनी सावधान असणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ स्त्रीवादी साहित्यिक डॉ. विमल थोरात यांनी व्यक्त केले. त्या आकांक्षा प्रकाशनच्या वतीने शेवाळकर सभागृहात रविवारी पार पडलेल्या प्रभावती सबाने स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या ‘ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार’ वितरण सोहळ्यात बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक डॉ. प्रमोद मुनघाटे व आकांक्षा मासिकाच्या संपादक अरुणा सबाने उपस्थित हाेते. याप्रसंगी ‘जाती तोडो, समाज जोडो’ या अभियानात स्वत:ला वाहून घेणाऱ्या उमरेडच्या जेबुन्निसा शेख यांना २०१९-२०चा तर बिहारमध्ये जाऊन मुलींच्या, दलितांच्या कामात स्वत:ला झोकून देणाऱ्या डॉ. कल्पना शास्त्री यांना २०२०-२१चा ‘ताराबाई शिंदे सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येकाला सर्व प्रकारचे अधिकारस्वातंत्र्य मिळाले आहे. स्त्रियांना हे स्वातंत्र्य मिळविण्यात अपार संकटांचा सामना करावा लागला. आता जेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले आहे, तेव्हा ते हिरावण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहे. त्यामुळे, सुधारणावादी महिलांनी आपली ऊर्जा वाचवून ठेवण्याचे आवाहन डॉ. विमल थोरात यांनी यावेळी केले. यावेळी डॉ. श्रीकांत तिडके व डॉ. प्रमोद मुनघाटे यांनीही मनाेगत व्यक्त केले, तर जेबुन्निसा शेख व डॉ. कल्पना शास्त्री यांनी समाजातील विसंगतीवर बोट ठेवत आपल्या भूमिका मांडल्या.
................