वीज वितरण कंपनीचे आवाहन
कळमेश्वर : पावसाळ्यात वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे तसेच सार्वजनिक, घरगुती वीज यंत्रणा किंवा उपकरणापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणचे अभियंता पंकज होनाडे यांनी केले आहे. अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीज खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर, पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्युज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीच्ड बोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळता येणे शक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडतात तसेच झाडे पडल्याने वीज खांब तुटला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा तुटलेल्या लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. शहरी व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १८००-२३३-३४३५ किंवा १८००-१०२-३४३५, १९१२ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लँडलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोल फ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.