निर्णय मागे घ्यावा : रुग्ण, अपंग अन् ज्येष्ठ नागरिकांची फरफटनागपूर : एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपूूर रेल्वेस्थानकावर सुरू असलेली बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्थानिक रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात अडचण होत असून त्यांच्या सुविधेसाठी, बंद करण्यात आलेली बॅटरी कार त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे. उपराजधानीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उर्वरित महाराष्ट्रासह विदर्भातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णांना एका प्लॅटफार्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणे कठीण होते. त्यामुळे रुग्णांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने शहरातील एका समाजसेवीच्या माध्यमातून बॅटरी कारची व्यवस्था केली होती. ही कार बॅटरीवर चालत असून तिला विद्युत प्रवाहाच्या माध्यमातून चार्जिंग करावे लागते. रोज सुमारे १०० च्या वर रुग्ण तसेच ज्येष्ठ नागरिक या सेवेचा लाभ घेतात. दिवसाकाठी ३०० ते ४०० कॉल या बॅटरी कारसाठी येतात. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक सहायक वाणिज्य व्यवस्थापकांनी दोन्ही बॅटरी कार चालकांना सेवा बंद करण्याचे लेखी आदेश दिले. उन्हाळ््यात रेल्वेगाड्यांमध्ये प्रकृती बिघडण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून दिवसाला सरासरी आठ ते दहा डॉक्टर कॉल्सची नोंद होत आहे, अशा स्थितीत बॅटरी कार बंद करून स्थानिक प्रशासन काय साध्य करणार आहे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त ‘डीआरएम’ ब्रिजेश कुमार गुप्ता यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मोबाईल ‘रिसिव्ह’ न केल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)प्रवाशांना ६५ रुपये भुर्दंडबॅटरी कारमुळे रुग्ण, अपंग प्रवासी, ज्येष्ठ नागरिकांना नि:शुल्क कोचपर्यंत जाण्याची सुविधा होती. परंतु आता रेल्वेस्थानकावर उपलब्ध असलेल्या व्हील चेअरमुळे कुलीच्या मदतीने कोचपर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना ६५ रुपये मोजावे लागणार आहेत. अनेकदा जवळ सामान असल्यामुळे अनेक प्रवासी आपल्या रुग्णांना कुलीच्या साहाय्याने कोचपर्यंत घेऊन जातात. त्यामुळे हा अतिरिक्त भुर्दंड आता प्रवाशांना सहन करावा लागणार आहे. बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय कशासाठी ?रेल्वेस्थानकावर बॅटरी कारमुळे मोठा अपघात झाल्याची कुठलीही नोंद मागील तीन वर्षात झालेली नाही. त्यामुळे गरीब रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी मदतीची ठरणाऱ्या बॅटरी कार बंद करण्याचा निर्णय कशामुळे घेण्यात आला, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
बॅटरी कारची सेवा अखेर बंद
By admin | Updated: April 28, 2016 02:42 IST