नागपूर : वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी गठित केलेल्या उपसमित्यांच्या अहवालाची सध्या प्रतीक्षा आहे. सूत्रांच्या मते, या तीनही उपसमित्यांच्या अहवालाच्या आधावरच समितीचा अंतिम अहवाल तयार केला जाणार आहे. अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सहा दिवस उरले असून, ती मुदत आता ३० मे रोजी समाप्त होणार आहे.
अंतिम अहवाल सादर करण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असताना दोन उपसमित्यांचा अहवाल येण्यास बराच विलंब होत आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आपल्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ वन अधिकारी शिवकुमार व इतरांकडून छळले जात असल्याचा त्यात उल्लेख होता. हे लक्षात घेऊन प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) साईप्रकाश यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.के. राव यांच्या अध्यक्षतेखाली ३१ मार्चला एक चौकशी समिती गठित केली होती. ३० मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले होते. या विलंबासंदर्भात माहिती घेण्यासाठी समितीचे अध्यक्ष पीसीसीएफ एम. के. राव यांच्याशी संपर्क साधला, मात्र ते एका बैठकीत व्यस्त असल्याने संपर्क होऊ शकला नाही.