नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आरोग्यसेवा बजावणाऱ्या आशा वर्कर आणि अंगणवाडीसेविकाच प्रशासनाच्या लेखी वाऱ्यावर आहेत. त्यांना सॅनिटायझर किट द्यावी, तसेच त्यांचा ५० लाख रुपयांचा विमा सरकारने उतरवावा, अशी मागणी आयटकने केली आहे.
नागपूर जिल्ह्यात संसर्ग वाढत असून, मृताच्या संख्येतही वाढ होत आहे. अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेवक, आरोग्यसेवक जिवाची पर्वा न करता, ग्रामीण भागात झुंज देत आहेत. जनप्रतिनिधी, जिल्हाधिकारी बैठका घेऊन देत असलेल्या आदेशाचे पालन हे कर्मचारी करीत आहे. या कर्मचाऱ्यांना पी.पी.ई. किट, सॅनिटायझर, औषध किट देण्याची गरज असूनही ती मिळत नाही. एका ऑक्सिमीटरवर दहा आशा कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे.
सेवारत असताना कोरोना योद्धा दगावल्यास ५० लाख रुपयांची विमा रक्कम त्यांच्या परिवाराला देण्याची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, जिल्ह्यातील एकाही आशा, अंगणवाडी कार्यकर्तीच्या कुटुंबीयांना मदत मिळालेली नाही. यामुळे जिवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची मने विचलित होण्याची शक्यता आहे. ही मदत न मिळाल्यास संचारबंदीचे नियम तोडून आंदोलन उभारण्याचा इशारा इशारा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) या कामगार संघटनेने दिला आहे.
...
‘त्यांच्या’ मृत्यूचा सन्मान करा
राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोप-प्रत्यारोपात जनता भरडत आहे. राजकीय पक्ष कोरोना योद्धांना प्रमाणपत्रे वाटण्याचे कार्यक्रम करून धन्यता मानत आहे. बेगम नसीम पठाण (रामटेक), लक्ष्मी ऊके आणि विना तांबे (कामठी), माला बोरकर (कळमेश्वर) या आरोग्यसेविका व भरतवाड्याच्या आशा कर्मचारी सविता कुकडे यांचा सेवाकाळात मृत्यू होऊनही कुटुंबाला आर्थिक मदत मिळाली नाही, तरीही हे कर्मचारी सेवा देतच आहेत. त्यांच्या सेवेचा सरकार व प्रशासनाने सन्मान करावा, अशी मागणी आयटकने केली आहे.
...