नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील हेरीटेज कस्तूरचंद पार्कवर रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी मिळविण्यासाठी सनातन धर्म युवक सभेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.
सभेने याकरिता सुरुवातीला महानगरपालिकेच्या हेरीटेज संवर्धन समितीकडे अर्ज सादर केला होता. समितीने उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे कारण नमूद करून तो अर्ज नामंजूर केला. त्याविरुद्ध सभेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने असा कोणताच आदेश दिला नाही, असे सभेचे म्हणणे आहे. या प्रकरणावर बुधवारी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महानगरपालिकेने सभेचा मुद्दा बरोबर असल्याचे मान्य केले, तसेच सभेच्या अर्जावर २८ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीमध्ये पुनर्विचार केला जाणार आहे, अशी माहिती दिली. करिता, या प्रकरणावर ४ ऑक्टोबर राेजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली. यावर्षी १५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे. प्रशासनाची परवानगी मिळाल्यास या दिवशी रावण दहन कार्यक्रम आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम गेल्या सुमारे ६० वर्षांपासून आयोजित केला जात आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी न्यायालय मित्र म्हणून, ॲड. अजय घारे यांनी सभेतर्फे तर, ॲड. जेमिनी कासट यांनी मनपातर्फे बाजू मांडली.