लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : तालुक्यातील १२७ गावांमध्ये कृषी संजीवनी मोहीम राबविण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. या मोहिमेचा प्रारंभ तालुक्यातील कळमना आणि हेवती या गावापासून करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक दिवशी महत्त्वांच्या मोहिमेकडे लक्ष राहणार असून, कृषी विभागाची चमू गावागावात पोहोचणार आहे.
रूंद वरंबा सरी तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, एक गाव-एक वाण तसेच तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान, विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञान व प्रसार, दोन पिकात उत्पादन वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग, कीड व नियंत्रणाच्या उपाययोजना अशा संपूर्ण कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या मोहिमेचा समारोप कृषी दिनाला करण्यात येणार आहे.
पंचायत समितीचे सभापती रमेश किलनाके यांच्या हस्ते मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी पी. एन. डाखळे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, मंडळ कृषी अधिकारी एन. टी. देशमुख, जि. प. सदस्य माधुरी गेडाम, एम. व्ही. खंडाईत, सरपंच सुरेखा वाघ, उपसरपंच भिकाजी भोयर, ग्रामसेवक जे. एन. पाडावी, ए. जी. शिंदे, शंकर कोरडे आदींची उपस्थिती होती.