लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील पाेलीस लाईन परिसर, कळमना टी-पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक आदी परिसरातील ट्रॅफिक सिग्नल बंद आहेत. परिणामी या ठिकाणी अपघाताचा धाेका बळावला असून, बेलगाम वाहतुकीवर आळा घालणे कठीण झाले आहे. वर्दळीच्या या चाैकात तात्काळ ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातून गेलेल्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस लाईन, कळमना टी-पॉईंट चौक, जयस्तंभ चौक, मोटर स्टँड चौक, ड्रॅगन पॅलेस भूमिगत मार्ग परिसरात वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. कामठी नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी गेल्या चार वर्षांपूर्वी ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले हाेते. त्यामुळे अपघातावर नियंत्रण मिळविण्यात यशही आले. दरम्यान, नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गाच्या सिमेंट चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने, या मार्गावरील वाहतूक सिग्नल प्रशासनाच्या वतीने बंद करण्यात आले होते. तेव्हापासून हे ट्रॅफिक सिग्नल बंद असून, नेहमीच अपघात घडत आहेत. अपघातामुळे अनेकांना अपंगत्वसुद्धा आले आहे. या मार्गावरील चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले. असे असताना चाैकातील ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे या भागात बेलगाम वाहतूक सुरू असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ट्रॅफिक सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.