दयानंद पाईकराव
नागपूर : वाहन चालविण्यासाठी पोलीस खात्याचे काही नियम आहेत. परंतु, अनेक वाहनचालक हे नियम पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने वाहन चालवितात. परिणामी वाहतूक पोलीस अशा वाहनचालकांवर कारवाई करतात. नागपुरात बेशिस्त वाहनचालकांची संख्या अधिक आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यास कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याची कारवाईसुद्धा केली जाते. मागील तीन वर्षांत १७ लाख ८४ हजार ७३६ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून २८ कोटी ४८ लाख ६६ हजार ६५० रुपये दंड वसूल केल्याची धक्कादायक माहिती आहे.
तीन वर्षांत झालेली कारवाई
वर्ष चालान दंड
२०१९ ४३५४७८ ८४९८९५००
२०२० ७३२०२८ १११२३१७५०
२०२१ (ऑगस्टपर्यंत) ६१७२३० ८८६४५४००
हे नियम मोडल्यास होते लायसन्सचे निलंबन
-नियमानुसार वाहन चालविणे गरजेचे आहे. परंतु, अनेकजण नियमांचे पालन करीत नाहीत. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, वेगात गाडी चालविणे, हेल्मेट न घालणे, आदी गुन्ह्यात वाहतूक पोलिसांनी पकडल्यास लायसन्सचे निलंबन करण्यात येते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
आधी तीन महिने, नंतर कायमस्वरूपी लायसन्स रद्द
-वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचा नियम तोडल्यास चालानची कारवाई करण्यात येते. वाहतूक पोलीस तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करतात. परंतु, वाहनचालक अनेकदा गुन्हे करीत असल्यास वाहतूक पोलीस प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास शिफारस करतात. त्यानंतर प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा वाहनचालकाचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतात.
वाहतूक नियमांचे पालन करा
‘वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होते. परंतु असंख्य वाहनचालक वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करतात. अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. अनेकदा कायमस्वरूपी लायसन्स रद्द करण्याची कारवाई होते. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.’
-बसवराज तेली, प्रभारी वाहतूक पोलीस उपायुक्त, नागपूर शहर
..........