नागपूर : मिश्रा म्हणाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेले प्रकल्प सुरू करता न आल्याने उत्पादनात घसरण झाली. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला. पण ऊर्जा निर्मिती क्षेत्राची गरज पूर्ण करण्यासाठी वेकोलिने कोळसा उत्पादनावर अधिक भर दिला आहे. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी केली आहे. जागा अधिग्रहणातील अडथळे दूर करणे, मानव संशोधनाची पुनर्निर्मिती करणे, प्रशासनाची कार्यक्षमता आणि कोळशाची क्षमता वाढविण्यावर विशेष भर आहे. यावर्षी ७ दशलक्ष टन कोळशाची क्षमता वाढविली आहे आणि २०२० पर्यंत सध्या सुरू असलेल्या ८२ खाणींमध्ये नव्याने ४२ खाणींची भर पडणार आहे. त्यामुळे कोळशाची उत्पादन क्षमता १०० दशलक्ष टनापर्यंत वाढणार असल्याचे मिश्रा म्हणाले. यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि सरचिटणीस शिरीष बोरकर आणि वेकोलिचे महाव्यवस्थापक (जनसंपर्क) मनीष सिंग उपस्थित होते. (प्रतिनिधी) गावकऱ्यांचा विश्वास संपादनस्थानिक गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी वेकोलितर्फे ‘संवाद’ नावाने विशेष प्रोत्साहन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वेकोलिच्या खाणींतून दरदिवशी निघणाऱ्या १० कोटी गॅलन पाण्याचा उपयोग स्थानिक लोकांसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बोअरवेल खोदणे, बंधारे बांधणे आणि टॅन्क बांधून हे पाणी गावातील विहिरीत आणि अन्य पाणी साठवणुकीच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. नायगाव येथे पायलट प्रकल्प यशस्वी झाला आहे. गेल्या सहा महिन्यात काही हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. याशिवाय हा प्रयोग प्रत्येक खाणीत करून पुढील पाच वर्षांत विदर्भातील २५०० ते ३००० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा दावा मिश्रा यांनी केला.
४२ खाणींची भर पडणार
By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST