कसा होणार ‘डिजिटल महाराष्ट्र’ : हिवाळी अधिवेशनात पहिल्यांदाच आॅनलाईन कामकाज कमलेश वानखेडे नागपूरविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने या हिवाळी अधिवेशनासाठी पहिल्यांदाच आमदारांचे प्रश्न आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या ‘आॅनलाईन’ प्रणालीला फक्त ४० टक्केच आमदारांनी प्रतिसाद दिला आहे. ६० टक्के आमदारांना अजूनही आपल्या पीए ला प्रत्यक्षात मुंबईत पाठवून प्रश्नशाखेत प्रश्न जमा करण्यातच रस असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘डिजिटल महाराष्ट्र’ चा संकल्प केला आहे. मात्र, आमदारच या चांगल्या मोहिमेसाठी पुढाकार घेणार नसतील तर कसे होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विधिमंडळ सचिवालयाने येत्या हिवाळी अधिवेशनासाठी दोन्ही सभागृहातील तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा व अशासकीय प्रस्ताव आॅनलाईन पद्धतीने स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एमकेसीएल च्या मदतीने सॉफ्टवेअर तयार करून घेण्यात आले. प्रत्येक आमदाराला एक पासवर्ड व लिंक देण्यात आली. आमदार किंवा त्यांच्या पीएनला प्रश्न टाकण्यासाठी मुंबई किंवा नागपुरात जावे लागू नये, त्यांना आपल्या मतदारसंघातच बसून लॅपटॉप किंवा कॉम्पुटरवरून प्रश्न टाकता यावे, हा या मागील उद्देश होता. यामुळे आमदारांच्या वेळेची बचत होणार होती.आॅनलाईन प्रश्न कसे सादर करायचे याची माहिती देण्यासाठी मुंबई येथे आमदार व त्यांच्या पीएंना दोन टप्प्यात प्रशिक्षणही देण्यात आले होते. आॅनलाईन पद्धतीने आलेले प्रश्न विधिमंडळाच्या सर्व्हरवर ओपन केले जातील व प्रश्नशाखा संबंधित विभागाकडे आॅनलाईन पद्धतीनेच प्रश्न हस्तांतरित करेल. यामुळे विधिमंडळाच्या कामाकाजात सुुसुत्रता व सहजता येणार होती.
४० टक्केच आमदारांची आॅनलाईन प्रश्नांना साथ
By admin | Updated: November 16, 2015 02:45 IST