खापा : कोविड प्रतिबंधात्मक नियमामुळे सार्वजनिक कार्याक्रमावर बंदी होती. आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ५० ऐवजी २०० लोकात लग्नसमारंभ आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. शासनाने प्रतिबंधात्मक नियमात काही अंशी शिथिलता आणली असली तरी पुढील चार महिने लग्नाचा मुहूर्त नसल्याने मंगल कार्यालय, कॅटरिंग व्यावसायिक, बॅंक पथकांना पुन्हा फटका बसला आहे.
गत दीड वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने मंगल कार्यालय, कॅटरिंग व्यावसायिक, बॅंक पथकांना मोठा आर्थिक बसला आहे. यातील अनेकांवर उपासमीरीची पाळी आली आहे. लॉकडाऊन काळात काहींनी घरीच साधेपणाने लग्न समारंभ उरकवून घेतल्याने कुठेच सनई-चौघड्या वाजल्या नाही. जिथे गर्दी झाली तिथे न.प.च्या वतीने कारवाई करण्यात आली. त्यामुळे कारवाईच्या भीतीने अनेकांनी आपला व्यवसाय गुंडाळून ठेवला होता. आता लग्नसमारंभाला ही अंशी परवानगी मिळत असली तरी याला चातुर्मासाचा फटका बसतो आहे.
--
दोन वर्ष कसे काढले हे आम्हाला माहीत. लग्नसराईचा काळ लोटून गेल्यावर सरकारने परवानगी दिल्याने आनंदासारखे काही नाही. सध्या कुणाचेही बुकिंग नाही.
- दिलीप सनेश्वर, राज बॅंड पार्टी, खापा
--
सरकारने दिलेल्या परवानगीचे उपयोग काय? आता चार महिने मुहूर्त नाही. १८ महिने व्यवसाय बुडाला. कोणी भरपाई करून देणार आहे का?
देवाजी बोरकर, संचालक, मंगल कार्यालय