उमरेड : भिवापूर तालुक्यातील मांगरुड येथील १५ विद्यार्थ्यांना अपचनातून बाधा निर्माण झाल्याने उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात रविवारी रात्री भरती करण्यात आले होते. अनुुदानित माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा येथे हा प्रकार घडला. उपचारानंतर बाधित विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. रोहित शंकर मरसकोल्हे, संजीवनी संदीप गेडाम, अभिनव विनोद सयाम, आंचल रवींद्र घरत, करण रवींद्र नभावरे, विद्या रवींद्र घरत, राजश्री, रामकृष्णा नन्नावरे, कार्तिक रामदास चित्रम, काजल ऋषी रंदई, वैष्णवी देवीदास चौधरी, वैष्णवी नन्नावरे, आकांक्षा देवानंद कुडमाते, रेणुका देवराम सिडाम, सुषमा कमलसिंग धुर्वे, संजीवनी संदीप गेडाम, महक गेंदलाल परतेकी अशी बाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. आश्रमशाळेचे अधीक्षक रविकांत काळे यांच्याशी याप्रकरणी संपर्क साधला असता, रविवारी शाळेत १३० विद्यार्थी होते. सकाळी अंडी आणि पोहे देण्यात आले. त्यानंतर दुपारच्या सुमारास जेवण देण्यात आले. सायंकाळच्या सुमारास काहींना अपचनाचा त्रास सुरू झाला. लागलीच विद्यार्थ्यांना उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचाराअंती १२ विद्यार्थ्यांना सुटीसुद्धा मिळाली. यापैकी तीन विद्यार्थ्यांना नागपूरला हलविण्यात आले. सध्या या तिघांचीही प्रकृती स्थिर असून, त्यांनाही सुटी देण्यात आल्याची माहिती काळे यांनी दिली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजितसिंग खंडाते यांच्याशी चर्चा केली असता, सदर प्रकार अधिकच्या भोजनामुळे काही विद्यार्थ्यांना अपचन झाल्याचे ते बोलले.
आश्रमशाळेतील सर्वच विद्यार्थ्यांनी नाश्ता आणि भोजन केले. विषबाधा झाली असती तर यात सर्वच विद्यार्थ्यांना त्रास झाला असता. अपचनामुळे १५ विद्यार्थ्यांना पोटदुखीची समस्या उद्भवली. त्यांना अधिक त्रास होऊ नये यासाठी तातडीने उपचारासाठी दाखल केले. आता सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
- दिलीप राऊत
अध्यक्ष, जय भवानी शिक्षण बहुउद्देशीय शिक्षण संस्था, उमरेड