बोगस बीटी बियाणे प्रकरण : ५ लाख ५० हजारांचा माल जप्तनागपूर : कृषी विभागाने बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणाऱ्या हिंगणा तालुक्यातील ११ कृषी केंद्रांविरुद्ध जप्ती कारवाई केली आहे. यात बोगस बियाण्यांचे ४५० पाकिटे जप्त करण्यात आली असून, त्यांची बाजारात किंमत सुमारे ५ लाख ५० हजार रुपये असल्याचे सांगितल्या जाते. हिंगण्याचे तालुका कृषी अधिकारी रत्नाकर येवले यांनी ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, कृषी विभागाच्या विभागीय व जिल्हा पथकाने गत काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी धाडी घालून १९ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बोगस बीटी बियाणे पकडले होते. यात हिंंगणा येथील पवन अॅग्रो ट्रेडर्सवर धाड घातली असता, येथे कवच, लॉटरी व यशोदा-२५५ नावाने विक्री केले जात असलेले बोगस बीटी बियाण्याचे ६ हजार ५४० पाकिटे आढळून आली होती. यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली असता, पवन अॅग्रो ट्रेडर्समधील हे बोगस बियाणे तालुक्यातील ११ कृषी केंद्रांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यात विक्री केले जात असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानुसार संबंधित कृषी केंद्राविरुद्ध गत दोन दिवसांत ही जप्ती कारवाई करून, तो संपूर्ण माल सील करण्यात आला. दुसरीकडे पवन अॅग्रो ट्रेडर्सचा परवाना यापूर्वीच रद्द करण्यात आला आहे. कृषी अधिकाऱ्यांच्या मते, पवन ट्रेडर्समध्ये पकडण्यात आलेल्या बोगस बीटी बियाण्यांच्या पाकिटवर पॅकेजिंग व विक्री म्हणून औरंगाबाद येथील कीर्तीमान कंपनीचा उल्लेख होता. परंतु त्यासंबंधी पवन अॅग्रो ट्रेडर्सच्या मालकाला विचारणा केली असता, त्यांनी तो संपूर्ण माल हिंगणघाट येथील यशोदा हायब्रीड सीड्स नावाच्या कंपनीकडून खरेदी केल्याचे सांगितले होते. त्यावर कृषी अधिकाऱ्यांनी बिलाची चौकशी केली असता, त्यावर मात्र नॉव्हेल्टी हायब्रीड सीड्सचा उल्लेख आढळून आला होता. (प्रतिनिधी)
११ कृषी केंद्रांविरुद्ध जप्ती कारवाई
By admin | Updated: July 3, 2014 00:57 IST