नागपूर : थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्याच्या मोहिमेमुळे नागपूर जिल्ह्यात महावितरणला भरपूर फायदा झाला आहे. जिल्ह्यात कापण्यात आलेल्या वीज कनेक्शनमधून १०१६२ कनेक्शन थकीत वीज बिल भरल्याने पुन्हा सुरू करण्यात आले आहे. किमान एक महिना चाललेल्या या मोहिमेतून महावितरणच्या तिजोरीत ४०१.८७ कोटी रुपये आले आहे. मात्र अजूनही २२९.०३ कोटी रुपये थकीत आहेत.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या मोहिमेला भरपूर विरोध झाला होता. तरीही महावितरणने जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकाकडे थकीत असलेल्या ३५० कोटी रुपयांच्या वसुलीसाठी ताकदीने मोहीम आरंभ केली. विनंती केल्यानंतर थकीत न भरणाऱ्यांची वीज कापून टाकण्यात आली. राज्य सरकारकडून मोहीम थांबवेपर्यंत जिल्ह्यात १८ हजार अवैध वीज कनेक्शन कापण्यात आले होते. यातून १०१६२ ग्राहकांनी थकीत भरून पुन्हा वीज कनेक्शन नियमित केले. उर्वरित ८ हजार ग्राहकांनीसुद्धा थकीत भरण्याची तयारी दर्शविली आहे. फेब्रुवारी महिन्यात ६४४७ व मार्चमध्ये आतापर्यंत ३७१५ ग्राहकांनी आपले कनेक्शन थकीत वीज बिल भरून नियमित केले आहे.
त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात ४०१.८७ कोटी महावितरणच्या तिजोरीत जमा झाले. नागपूर अर्बन सर्कल (नागपूर शहर व बुटीबोरी-हिंगणा) या महिन्यात एकूण डिमांड २१४.१८ कोटी रुपये होती. परंतु वसुली २५२.३५ कोटी रुपये झाली. नागपूर ग्रामीण सर्कलमध्ये ११९.४५ कोटी रुपयांच्या डिमांडमधून १४९.५२ कोटी रुपयांची वसुली झाली, तरीही ५६.०६ कोटी रुपये अजून वसूल व्हायचे आहे.
- थकीत भरण्याची विनंती
महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले, राज्य सरकारच्या निर्देशानुसार आता थकबाकीदारांचे कनेक्शन कापणे बंद केले आहे. थकीत वीज बिल असणाऱ्यांना आवाहन करण्यात येो की, त्यांनी आपला वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी थकीत बिल भरावे.