नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्याप्रकरणातील एका आरोपीला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना काटोल येथील आहे.अजय ऊर्फ पप्पू रामलाल बारके (३८) असे आरोपीचे नाव असून तो काटोल येथील रहिवासी आहे. मृताचे नाव आरिफ होते. तो पानठेला चालवत होता. सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार, १ जून २००४ रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आरोपीने आरिफच्या पानठेल्यावर जाऊन उधारीवर सिगारेट मागितली. आरिफने नकार दिल्यामुळे आरोपीने वाद घातला. दरम्यान, आरोपीने अचानक चाकू काढून आरिफवर हल्ला चढवला. यामुळे गंभीर जखमी झालेल्या आरिफचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.२८ मार्च २००६ रोजी नागपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व प्रसन्न वराळे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपीला दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायालयाचा इतर आदेश कायम ठेवण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
हत्या करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास
By admin | Updated: September 19, 2015 04:01 IST