शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

एकेकटे

By admin | Updated: March 10, 2017 16:12 IST

दिवसेंदिवस श्रीमंत आणि एकेकट्या होत चाललेल्या आपल्या शहरातील सुशिक्षित, कमावती वगैरे कुटुंबे आधीच आपल्या-आपल्या बेटांवर जाऊन जगू लागली आहेत. आता त्यांच्यातला एकच बाबा किंवा एकच आई आपापले मूल एकट्यानेच जन्माला घालू लागले आहेत. अशा एकट्या पालकांच्या बेटावर वाढणारी ही मुले नेमकी कोणाची? मूल हे आपल्याकडे निसर्गामध्ये, अनेक वृत्ती आणि गुणांच्या माणसांमध्ये वाढत होते. आता ते एकट्या आईचे किंवा बाबाचे होऊ लागले आहे का?

वन्दना अत्रे
 
करण जोहर यांच्या घरात आलेल्या यश आणि रुही या नवजात जुळ्यांच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा होत असताना, ‘बेटर इंडिया’ नावाच्या वेबसाइटवर आणखी एक महत्त्वाची घटना लक्ष वेधून घेत होती. आणि ती कहाणी होती आदित्य नावाच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची. मूल दत्तक घेणारा भारतातील हा सर्वात तरुण एकल पालक आहे. अविवाहित आदित्यने जे मूल दत्तक घेतले ते डाउन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे हेही मुद्दाम सांगायला हवे.
करण आणि आदित्य या दोघांच्या गोष्टीत एक मजेशीर समान दुवाही आवर्जून नोंदवावा असा आहे. 
कोणता, तर या दोघांनाही (अनुक्र मे) संसदेने संमत केलेल्या आणि न केलेल्या (सुद्धा) कायद्याचा फायदा मिळाला आहे. आदित्यने जेव्हा बिन्नी या मुलाला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा त्याचे वय होते २७, आणि भारतीय राज्यघटना तेव्हा ३० वर्षांखालील अविवाहित व्यक्तीला मूल दत्तक घेण्याची संमती देत नव्हती. आदित्यने हे मूल दत्तक मिळावे यासाठी दोन वर्षे अथक लढाई केली. त्यात थेट केंद्रीय बालकल्याण खात्याच्या मंत्री मनेका गांधी आणि लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्यापर्यंत धडक मारली. आपले गाऱ्हाणे, बिन्नीला ज्या आश्रमात ठेवले होते तेथील गैरव्यवहार हे सगळे आदित्य सतत अतिशय आग्रहाने त्यांच्यापुढे मांडत राहिला. तो रेटा कमी पडतो आहे असे वाटले तेव्हा आदित्यने स्थानिक माध्यमांची मदत घेतली. त्याचे सुदैव असे की, गेल्या ९ मे रोजी संसदेने दत्तक घेण्यास इच्छुक पालकाचे वय कमी करणारे विधेयक संमत केले आणि १ आॅगस्ट रोजी अंमलात आलेल्या नव्या तरतुदींमुळे आदित्यचा मार्ग मोकळा झाला. २०१६ साल उगवता-उगवता बिन्नी आदित्यच्या कुटुंबाचा भाग झाला.
बिन्नी जसा आदित्यच्या कुटुंबात आला तसेच सरोगसीच्या मदतीने जन्माला आलेली यश-रुही ही दोन बाळे करणच्या आयुष्यात येऊ शकली, ती मात्र संसदेत अजून संमत न झालेल्या सरोगसीविषयक कायद्यामुळे! 
भारतात भरभराटीला आलेल्या आणि अनेकानेक वादांचे कारण ठरलेल्या ‘सरोगसी’ या फोफावत्या क्षेत्राचे नियमन करण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लोकसभेत एक विधेयक मांडले गेले. हे विधेयक पुढे जानेवारीत अवलोकनासाठी संसदीय पार्लमेंटरी कमिटीपुढे गेल्याने अजून संमत झालेले नाही. 
हे विधेयक एकल पालकाला सरोगसीने अपत्यप्राप्तीची संमती देत नाही.
‘आम्ही समलिंगी, विवाहाशिवाय एकत्र राहणारी जोडपी यांना ओळखत नाही कारणIt is not in our ethos so they are not allowed to commission babies through surrogacy असे या समितीच्या प्रमुख म्हणून सुषमा स्वराज यांनी ठणकावून सांगितले, तेव्हा वादाला तोंड फुटले.
जगभरातील जोडपी सरोगसीसाठी भारतात येत असताना, सरोगसी हब अशी ओळख आणि प्रचंड परकीय चलन मिळवून देणारी बाजारपेठ गजबजलेली असताना सरकारने घेतलेल्या या भूमिकेमुळे गदारोळ उठला. या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, डॉक्टर्स, या बाजारपेठेशी निगडित अनेक तऱ्हेचे व्यावसायिक यांच्या जणू अस्तित्वालाच धक्का देणारे असे हे विधेयक असल्याने त्यावर खूप गदारोळ झाला. आणि चर्चांचे वारे अजून फारसे थंडावलेले नाही. इतक्या सहजपणे हे विधेयक संमत होईल याची हमी आज तरी नक्कीच देता येणार नाही 
 
अशी एकूण परिस्थिती आहे. 
- करण जोहर याच्या जुळ्या मुलांच्या जन्माची बातमी माध्यमांसाठी फार चुरचुरीत ठरली त्यामागचे हेही कारण होते..! 
करणचे बहुचर्चित लैंगिक जीवन, त्याबद्दल सुषमा स्वराज यांनी संस्कृतिरक्षकाच्या भूमिकेतून जाहीरपणे व्यक्त केलेली नापसंती आणि तरीही करणला झालेली अपत्यप्राप्ती असा हा रंगतदार त्रिकोण!
- हे सारेच गुंतागुंतीचे आहे खरे. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विस्तारत्या कक्षा, रूढ नैतिकतेच्या चौकटींना धक्के देणे शक्य करणारी तंत्रवैज्ञानिक प्रगती आणि या साऱ्याचे नियमन करताना अनेकानेक शक्यतांच्या गुंत्यात अडकलेली ‘व्यवस्था’!
- पण त्याहीपलीकडे हरेक सामान्य स्त्री-पुरुषांच्या मनात नक्की येऊन जाणारा एक प्रश्न आणि कुतूहलही आहे : ते आहे असे स्वेच्छेने एकल असलेल्या पालकांच्या अपत्य संगोपनाबद्दल. 
स्वेच्छेने असो किंवा परिस्थितीने लादलेले असो, एकल पालकत्व हे एक मोठे आव्हान असते. दोन्ही पालकांकडून होत असलेल्या संगोपनापेक्षा थोडे अधिक खडतर, परीक्षा बघणारे. हे स्त्रीसाठी अधिक सोपे की पुरु षांना पण झेपणारे हे बघावे म्हणून शोधले तेव्हा थोडी विस्मयकारक वाटावी अशी माहिती हाती आली.
सध्या स्वेच्छेने घरी राहणाऱ्या पुरु षांची संख्या जगभरात वाढली आहे. हे पुरु ष आपल्या अपत्यांबरोबर भरपूर वेळ घालवत असल्याने पालक म्हणून मूल सांभाळण्यासाठी आई होणेच/असणे गरजेचे नाही असा आत्मविश्वास त्यांना येतो आहे. अशा एकल पालक असलेल्या वडिलांसाठी चक्क हेल्पलाइन्स सुरू झालेल्या आहेत. एकीकडे एकल पालकांच्या समवेत वाढणारी मुले मानसिक आजारांना बळी पडतात, परिस्थितीशी जमवून घेणे त्यांना अवघड जाते, वडील घरात नसलेले मूल दु:खी असते, मुलाच्याच लिंगाचे पालक (मुलीसाठी आई आणि मुलासाठी वडील) घरात नसेल तर ज्याचे अनुकरण करावे असे रोल मॉडेल त्याला मिळत नाही असे दाखवणारे अनेक अभ्यास होत आहेत. 
आणि एकल पालकत्व निभावताना त्या एकाला वाहाव्या लागणाऱ्या प्रश्नांचा भार न सोसणारे पालकही दिसत आहेत. 
- मुलाबद्दल कोणताही निर्णय एकट्याने घेण्याची भीती, त्याचे प्रश्न वाटून घेण्यासाठी कोणी साथीदार नसल्याची वेदना, एकल पालक आई असेल तर सतत भेडसावणारी आर्थिक विवंचना, मुलांना समाजात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना घरात एकट्याने उत्तर देताना उडणारी तारांबळ असे कितीतरी प्रश्न रोज या पालकांना हाताळावे लागत आहेत. मग तरी का स्वीकारतात लोक असे एकल पालकत्व? 
वयाची जेमतेम तिशी गाठताना एका मुलाला (एकट्याने) दत्तक घेणाऱ्या अविवाहित आदित्यला हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने आपल्या आईकडे बोट दाखवले आणि तो म्हणाला, ही आहे माझा आणि अवनीशचा आधार. 
आणि तिकडे करण जोहरही त्याच्या ‘केअरिंग’ आईचा हवाला देत आपल्या बाळांचे संगोपन तीच करणार असल्याचे सुचवतो आहे. मग अशावेळी हमखास पडणारा प्रश्न म्हणजे, मूल वाढवणे ही फक्त पालकांची जबाबदारी असते की समाजसुद्धा वाढवत असतो प्रत्येक मुलाला? 
न्यू यॉर्कच्या मेट्रोमध्ये प्रवास करताना अनुभवलेली एक घटना मनात फार घर करून बसली आहे. गाडीत त्या दिवशी मुंबईछाप गर्दी होती. आणखी माणसे आत येऊन थोडी धक्काबुक्की सुरू झाली तेव्हा एक माणूस ओरडला, there is a child sleeping here, please do not push anymore....!  
एखाद्या जखमी पिल्लाचे रक्षण करण्यासाठी उभे राहावे तसे आपले दोन्ही हात पसरून त्या बाळाच्या रक्षणासाठी उभा असलेला तो माणूस त्या बाळाचा बाप नव्हता हे विशेष...! 
त्याक्षणी मला माझ्या देशात उन्हातान्हात उभे राहून रस विकणारी, बांधकामावर दिवसभर मातीत खेळणारी, रात्री उघड्या मैदानात थंडीत काकडत झोपणारी कितीतरी मुले आठवली...! 
कुटुंब व्यवस्था जन्माला येण्यापूर्वी माणूस जेव्हा टोळी आयुष्य जगत होता तेव्हा त्या टोळीमध्ये जन्माला येणाऱ्या मुलाला फक्त त्याची आई ठाऊक असायची.. बाकी ते मूल टोळीत वाढायचे. 
पुढे माणूस शहाणा झाला. 
त्याला त्याचे कुटुंब मिळाले. मग मूल सांभाळण्याचे काम समाजाने एकदम झटकून टाकले आणि फक्त आई-बाबांच्या किंवा त्यापैकी कोणा एकाच्या गळ्यात अडकवून टाकले तेही इतक्या निर्दयपणे की रस्त्यात दिसणारे एखादे असहाय्य मूल, वाहनांच्या सुसाट गर्दीत भांबावून उभी एखादी नऊ महिने भाराने अवघडलेली स्त्री, मुलांना कोंबून निघालेल्या रिक्षा यापैकी काहीच या समाजाला दिसेनासे झाले आहे. 
दोन्ही पालक असताना मुलाचे संगोपन अवघड वाटावे अशी ही आजची आपली परिस्थिती असताना हे एकेकटे पालक कसे वाढवणार आहेत आपल्या मुलांना? केवळ त्यांच्याकडे असलेल्या भरभक्कम पैशाच्या जोरावर सगळ्या संगोपन सेवा विकत घेऊन? किंवा मग बाळाच्या आजीच्या बळावर? मोठा अवघड वाटतो हा प्रश्न. 
नानी, मोलाने कामाला ठेवलेली दायी किंवा बाई यांच्या भरवशावर वाढणारे मूल फक्त त्या कुटुंबाचे असते, समाजाचे नसते, कधीच...! दिवसेंदिवस श्रीमंत आणि एकेकट्या होत चाललेल्या आपल्या शहरातील सुशिक्षित, कमावती वगैरे कुटुंबे आधीच आपल्या-आपल्या बेटांवर जाऊन जगू लागली आहेत. आता अशा एकट्या पालकांच्या बेटावर वाढणारी मुले नेमकी कोणाची? 
पार्वतीचा मुलगा कार्तिकेयाचे आई-वडील कोण होते? असे म्हणतात, अग्नी आणि वायू हे त्याचे वडील होते आणि गंगा ही जलदेवता, पार्वती ही पर्वतदेवता, शर्वाना ही जंगलदेवता आणि कृतिका ही तारकादेवता या त्याच्या माता होत्या. या विधानाचा शब्दश: अर्थ न घेता त्याकडे बघितले तर दिसते एकच, मूल हे आपल्याकडे निसर्गामध्ये, अनेक वृत्ती आणि गुणांच्या माणसांमध्ये वाढत होते. आता ते एकट्या आईचे किंवा बाबांचे होऊ लागले आहे का? 
 
…You need a village to raise a child  अशी एक आफ्रिकन म्हण आहे. 
त्या खेड्यातील माती, त्या मातीचा वास असलेले पाणी, त्यातील एखाद्या न शिकलेल्या बुजुर्गाचे शहाणपण, तेथे पिकत असलेल्या धान्याचे कोवळेपण, मोकळा-ढाकळा स्वैर वारा आणि कडाडणाऱ्या उन्हाचा चटका हे सारे त्या मुलाला खऱ्या अर्थाने मोठे आणि समाजाचे करीत असते. आमची मुले अशी समाजाची आणि समाजासाठी आता कधीच होणार नाहीत का? 
करण किंवा आदित्य अशा तरुण पिढीच्या एकल पालकत्वावरून असा मोठा निष्कर्ष आणि तोही इतक्या घाईने काढणे कदाचित खूप साहसाचे वाटेल. असेलही कदाचित. 
- पण मती गुंग करून टाकणाऱ्या तंत्रवैज्ञानिक प्रगतीने जन्माला घातलेल्या शक्यतांचा विचारही करणे आवाक्याबाहेर होत चाललेल्या समाजातल्या एका पिढीला आज ही काळजी वाटते आहे, हे नक्की!
 
स्त्रिया, पुरुष आणि 
सरोगसी
एकट्या पुरुषानं सरोगसीच्या साहाय्यानं मूल जन्माला घालणं, त्याचं एकल पालकत्व स्वीकारणं यासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. मात्र शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या किंवा नसलेल्या एखाद्या स्त्रीने सरोगसीच्या साहाय्यानं मातृत्व स्वीकारलं तर कायदा आणि समाज त्याला परवानगी देईल का? स्वत: मूल जन्माला घालणं शक्य असतानाही सरोगेट मातेकडून मूल जन्माला घालून घेणं हे दुसऱ्या स्त्रीला जमेल का? आणि जमलंच तर त्याला सामाजिक मान्यता मिळेल का?
या प्रकारच्या एकल मातृत्वाला आपला कायदाही मंजुरी देतो का?
- प्रख्यात विधिज्ञ अमित कारखानीस यांना विचारले. अ‍ॅड. कारखानीस यांनी सरोगसीच्या संदर्भात अनेक खटल्यांत काम पाहिलेलं आहे.
अ‍ॅड. कारखानीस सांगतात..
१) आजच्या घडीला आपल्याकडे सरोगसीच्या एकूण व्यवस्थेचं नियमन करणारा कायदा नाही. आहे ते मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेलं विधेयक. त्यामुळे आज एकल पुरुष आणि स्त्रीही सरोगसीच्या मदतीनं मूल जन्माला घालू शकतात. सध्या ते बेकायदेशीर नाही. सरोगसीचा प्रस्तावित कायदा अंमलात आल्यानंतर कदाचित चित्र बदलेल!
२) सरोगसीसंदर्भातलं विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीपुढे चर्चेला मांडण्यात आलेलं आहे. त्यात सुधारणा, बदल होत आहे. चर्चा सुरू आहे. मात्र या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतर एकल पुरुष किंंवा स्त्रीला सरोगसीच्या मदतीनं मूल जन्माला घालता येणार नाही. कारण कायदा कदाचित एकल पालतकत्वाला, त्यात आई किंवा वडील दोन्ही आले आणि लिव्ह इनमध्ये असलेल्या जोडप्याला सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्याची परवानगी देणार नाही. त्यामुळे कायदा आल्यानंतर एकल पालकत्व स्वीकारू इच्छिणाऱ्यांसाठी सरोगसी हा पर्याय कदाचित उपलब्ध नसेल.
३) स्त्रिया एम्ब्रिओ ट्रान्सफर, आयवीएफ या पद्धतीने स्वत: मूल जन्माला घालू शकते. त्यामुळे स्त्रियांसाठी सरोगसीद्वारे मूल हा पर्याय कदाचित खुला राहणार नाही.
४) विधेयकातील आजच्या तरतुदींनुसार ज्यांचा विवाह झाला आहे, विवाहानंतर पाच वर्षे ज्यांनी अपत्यप्राप्तीसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तरीही त्यांना अपत्यप्राप्ती होत नसेल तर सरोगसीचा पर्याय कायदेशीररीत्या उपलब्ध असेल.
५) सरोगसीद्वारे मूल जन्माला घालणाऱ्या पालकांमध्येही नैसर्गिक पालकत्वाचा अधिकार पित्याकडेच राहील. कारण हिंदू पालकत्व कायद्यानुसार आजही पिताच मुलाचा नैसर्गिक पालक मानला जातो. पित्याचा मृत्यू झाला तरच मातेकडे नैसर्गिक पालकत्व येतं. या कायद्यात अजून 
लिंग समानता आलेली नाही. त्यामुळे सरोगसीद्वारे जन्माला आलेल्या मुलाचा नैसर्गिक पालकही पिताच ठरतो.
 
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक आहेत.)