कॅ. निलेश गायकवाड
विमान उडते कसे, उतरते कसे, ते हवेत स्थिर राहते कसे? -विमानप्रवास आता अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेला असला तरी या सार्या गोष्टींबाबत आपले कुतुहल शमलेले नसते. त्याचबरोबर आयुष्यात एकदा तरी विमान प्रवास करायचाच ही सुप्त इच्छाही प्रत्येकाच्या मनात खोलवर दडलेली असते.
पण अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता विमानप्रवास खरेंच सुरक्षित आहे का, नेमके आपलेच विमान कोसळले तर काय?. अशी भीतीही सामान्यांच्या मनात मूळ धरते आहे.
२0१४ या वर्षात तर आजवरचे सर्वाधिक विमान अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे असंख्य लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
तालिबान्यांनी उद्ध्वस्त केलेले अमेरिकेचे ट्वीन टॉवर्स, अपहरण केलेली विमाने, बमुर्डा ट्रँगलमध्ये गायब झालेली विमाने, असंख्य जहाजे. अशा अनेक घटनांनी लोकांच्या मनात विमानप्रवासाबद्दल अगोदरच दहशत आणि प्रचंड गोंधळ निर्माण केला आहे.
कालचेच उदाहरण. एअर एशियाचे अचानक गायब झालेले विमान ! अजून पहिल्या शोधाची पूर्तता झालेली नसताना दुसरा भीतीदायक प्रसंग !
विमान प्रवासाची किंवा वेगवेगळ्या विमान कंपन्यांची सुरक्षा व्यवस्था आणि सद्य परिस्थिती पाहता सामान्य माणसाच्या मनात कुतुहलापेक्षा विमान प्रवासाची भीतीच दडलेली आढळते.
विमान अचानक गायब कसे काय होते?
तंत्रज्ञान जर एवढे प्रगत आहे तर मग विमान अचानक दिसेनासे कसे होऊ शकते आणि त्याचा पत्ताही लागू नये?
विमानाशी संपर्क तुटतो म्हणजे काय होते? हरवलेल्या विमानाचा शोध कसा लावला जातो?.
अशाच काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.
एअर ट्रफिक कंट्रोल रडार बेकन सिस्टीम
हवाई वाहतुकीवर लक्ष ठेवणे किंवा त्याचे नियंत्रण कर्याचे काम ‘एटीसीआरबीएस’ ही यंत्रणा करते. ही व्यवस्था एअर ट्राफिक कंट्रोल सिस्टीमला मदत करते. एअर ट्रफिक कंट्रोल सिस्टीममध्ये बरेच विभाग असतात ज्यामुळे हवाई वाहतूक नियंत्रित करता येते. वातावरणाचा अंदाज, हवेतील बदल, कार्यरत नसलेल्या धावपट्टीची माहिती, उड्डाण करणारे आणि धावपट्टीवर उतरणारे विमान याबद्दल माहिती देणारी यंत्रणा, त्यासंदर्भातला टॉवर, विमानाचा नियोजित मार्ग. या सर्व गोष्टींची माहिती वैमानिकाला मिळणे गरजेची असते आणि त्यासंदर्भाची यंत्रणाही कार्यरत असते. या सार्या यंत्रणा एकत्रितपणे वैमानिकाला मदत करत असतात. त्यामुळे वैमानिकाला विमान उड्डाण सुलभ होते. मात्र यातील एखाद्या जरी यंत्रणेने काम करणे बंद केले तरी वैमानिकासमोर अडचणी उद्भवू शकतात.
ब्लॅक बॉक्स
या सर्व यंत्रणांसोबत विमानात एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो, तो म्हणजे ब्लॅक बॉक्स. जो अशा अपघातांमध्ये खूप मोलाचे सहकार्य करतो. या ब्लॅक बॉक्समध्ये दोन प्रकारची माहिती संग्रहित होते, एक म्हणजे विमानाची माहिती आणि दुसरे म्हणजे विमानाच्या कॉकपीटमधील संभाषणाची.
विमानाचे तपमान, उंची, इंजिनाची कार्यप्रणाली, विमानाचा वेग, अपघातापूर्वी विमानाची स्थिती काय होती, ही माहिती त्यात असते. वैमानिकाचे एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमशी जे संभाषण होते तेदेखील याठिकाणी संग्रहित होते. विमानात काही तांत्रिक बिघाड असेल, तर त्याबद्दलची इत्यंभूत माहिती या ब्लॅक बॉक्समधून कळते. त्यामुळेच विमान अपघातांमध्ये शोधकार्यात सर्वप्रथम ब्लॅक बॉक्सचा शोध घेण्यात येतो.
रडार
रडारचा वापर मुख्यत्वेकरून एखाद्या वस्तूची नोंद घेण्यासाठी, ती वस्तू किती अंतरावर आहे याबद्दल व तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येतो. विमानाच्या हालचालींवरून विमानाचा वेग किती आहे, ते कोणत्या दिशेला जात आहे ही माहिती रडार आपल्याला देऊ शकते. रडारमधील रेडिओ लहरींच्या सहाय्याने आपल्याला ही सगळी माहिती मिळते. विमानोड्डाणासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती देणारे हे रडारही आता अत्याधुनिक होत आहे. ‘फोटोनिक रडार’ संशोधकांनी तयार केले आहे; मात्र अजून ते प्रायोगिक अवस्थेत आहे.
वैमानिकाचे कसब
विमान यंत्रणाच अतिशय क्लिष्ट आणि सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. छोटीशी चूकही विमानाच्या आणि प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते. अशावेळी येणार्या वैमानिकाचे कसब, संकटाला तोंड देण्याचा त्याचा आत्मविश्वास आणि त्याचे प्रसंगावधान हीच गोष्ट अंतिमत: महत्त्वाची ठरते. याच जोरावर आजवर अनेक तज्ज्ञ वैमानिकांनी संभाव्य भीषण अपघात परतवून लावले आहेत.
तरीही सुरक्षित!
वैमानिकाच्या सावधानतेमुळे आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम्समुळे बर्याचदा विमानाचे व्यवस्थित लॅन्डिंग करण्यात आले आहे. व्हर्जिन अटलांटिक ४३ हे त्यातले अगदी ताजे परवाचे उदाहरण.
अलीकडच्या काळात झालेल्या अनेक विमान अपघातांमुळे विमानप्रवासावर प्रश्नचिन्ह उमटवले जात असले तरीही तंत्रज्ञान आणखी वेगाने पुढे जात आहे. शिवाय आजही जल, लोह आणि रस्तेमार्गापेक्षा हवाई प्रवास सर्वात जलद व सुरक्षित मानला जातो.