मोकळ्या जागेवर पुनर्भरण : ‘पाणी साठवा, गाव वाचवा अभियान’ रूपेश उत्तरवार - यवतमाळ अपुऱ्या पावसाने राज्यातील १२३ तालुके दुष्काळाच्या छायेत सापडले आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी उपाय योजना जाहीर तर झाल्यात पण त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून यवतमाळात विश्वासनगर पॅटर्नचा पायलट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सोबतच जिल्हा परिषदेने ‘पाणी वाचवा, गाव वाचवा’ अभियान हाती घेतले आहे. या प्रयोगाची देशभरात अंमलबजावणी व्हावी म्हणून या प्रकल्पाचा प्रस्ताव येथील विवेकानंद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डॉ.नितीन खर्चे यांनी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. यवतमाळातील विश्वासनगराच्या खुल्या जागेवर जलसंधारणाचा प्रयोग राबविण्यात आला. पूर्वी हा भाग पाणी टंचाईचा भाग म्हणून ओळखला जायचा. या प्रयोगाने या भागाच्या जलस्त्रोतात मोठी वाढ झाली. त्यामुळे या भागाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी भेट दिली. या प्रयोगाची माहिती घेतली आणि जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागात हा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला. प्रायोगिक तत्वावर काही गावांमध्ये तो राबविला जाणार आहे. यवतमाळातील मनिहार ले-आऊटमधून या प्रयोगाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रयोग टंचाईग्रस्त भागात राबविला जाणार आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी या प्रयोगाला मान्यता दिली होती. आता नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल हा प्रयोग राबविण्यासाठी पुढे आले आहेत. जिल्हा परिषद प्रशासन ‘पाणी साठवा पाणी वाचवा’ अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेने तयारी केली आहे.
दुष्काळावर मात करणार यवतमाळचा ‘विश्वासनगर’ पॅटर्न
By admin | Updated: August 18, 2014 00:29 IST