पिंपरी चिंचवड : केंद्रीय कामगार संघटनांनी प्रस्तावित कायद्यातील बदलाच्या विरोधात २ सप्टेंबरला करण्यात येणाऱ्या प्रस्तावित संपात फूट पडली आहे. भाजपाप्रणीत भारतीय मजदूर संघाने संपातून माघार घेतली आहे. १२ पैकी ७ मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्याने संपातून बाहेर पडत असल्याचे मजदूर संघाच्या नेत्यांनी सांगितले. उर्वरित १० केंद्रीय कामगार संघटना मात्र संपावर ठाम आहेत. केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कामगारांचे हक्कच हिरावले असल्याचे कामगार संघटनांचे म्हणणे आहे. मागण्यांसंदर्भात संघटनांच्या प्रतिनिधींच्या १९ जुलै, २६ व २७ आॅगस्ट अशा तीन बैठका दिल्लीत झाल्या. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, कामगार मंत्री दत्तात्रय बंगारू, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह केंद्रीय कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.किमान वेतन सूत्र बदलण्यास तयार असून इंडियन लेबर कौन्सिल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान वेतन ठरविण्यात येईल. कामगार कायद्यात बदल करण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा करण्यात येईल. ट्रेड युनियन कायद्यात बदल करण्यात येणार नसल्याचे केंद्र सरकारने बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे संपात सहभागी होणार नसल्याचे भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कामगार संपात फूट !
By admin | Updated: August 31, 2015 01:00 IST