पुणे : आपल्याकडे महिलांना कायम पुरुषांची सावली म्हणून पाहिले जाते. परंतु ही प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी स्वत:ला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवे. त्यामुळे देशाचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व आॅल इंडिया अॅँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम.एस. बिट्टा उपस्थित होते. या वेळी आचार्य ब्रह्मऋषी गुरुवानंद स्वामी यांना ‘सूर्यरत्न -आधुनिक युगाचे संत’ हा पुरस्कार देण्यात आला. तर पद्मभूषण डॉ. सत्यव्रत शास्त्री, न्यायमूर्ती पी. बी . सावंत, प्यारेलाल शर्मा, पद्मभूषण राजन व साजन मिश्रा, दिलीप छाब्रिया, डॉली ठाकूर, मोतिलाल ओसवाल, उदित नारायण यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पवनकुमार रुईया, अंजली गोपालन, राजेंद्र मेहता, लीना मोगरे, दिनेश नाथानी, मानवेन्द्रसिंग गोहिल, डॉ. रणजित जगताप, विवेक वेलणकर, प्रदीप लोखंडे, सुधीर गोयल, सायली आगवणे, निलाद्री कुमार व अमृता फडणवीस यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांची पत्नी ही माझी ओळख असली तरी त्यापलीकडे जायला मला आवडते. देशसेवेची सुरुवात ही कुटुंब आणि समाजसेवेपासून व्हायला हवी. मुख्यमंत्रीही सामाजिक कामाला कायम प्रोत्साहन देतात. मी पुरस्कार कधीही परत करणार नाही, कारण पुरस्कार परत करणे हा तो देणाऱ्याचा अपमान करण्यासारखे असते. पुरस्कार हा प्रसादासारखा असल्याने तो कधीही परत केला जात नाही. श्याम जाजू म्हणाले, समाजाचे परिवर्तन करणे ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. समाज, त्यातील लोक, परिस्थिती सारखीच आहे मात्र पंतप्रधान ती ज्या पद्धतीने मांडत आहेत ती विशेष आहे. येत्या ५ वर्षांत इन्स्टिट्यूटचे रूपांतर विद्यापीठात करणार असल्याचे डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. या वेळी फडणवीस यांनी ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’ हे भजनही सादर केले. सूत्रसंचालन जयकिशन शर्मा यांनी केले.
महिलांनी सक्षम व्हायला हवे : अमृता फडणवीस
By admin | Updated: February 8, 2016 02:18 IST