पंकज रोडेकर,
ठाणे- सावधान... दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांनो, सावधान... आपण जर पकडले गेलात तर आपला वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर आपले नावही ठाणे शहर वाहतुक नियंत्रण शाखेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होऊ शकते. त्यामुळे दाऊ पिऊन वाहन चालवायचे की नाही, हे आपणच आपले ठरवायचे आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मद्यपींना धडा शिकवण्याचा हा अनोखा उपाय ठाणे शहर पोलिसांनी अवलंबल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरवर्षी नव्या वर्षाची सुरूवात अपघातविरहीत व्हावी, यासाठी वाहतुक शाखेने मद्यपी वाहन चालकांविरोधात मोहिम हाती घेत, कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली. मात्र ही मोहीम या वर्षात तितक्याच तीव्रतेने अजूनही सुरूच आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर या परिसरात मद्यपी चालकांविरोधात वाहतुक शाखेने साडेपाच हजार गुन्हे नोंदवले आहेत. तसेच त्यातील प्रत्येकाकडून दोन हजार रूपयांप्रमाणे दंड आकारला आहे. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात वाहतूक शाखेने तीन हजार ३०० मद्यपींना पकडले आहे. तसेच ३०१ ते ५०० मिली ग्रॅमपेक्षा अधिक म्हणजे ओव्हर रेंज झालेले मद्यपी कारवाईत सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.>दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांत दुचाकीस्वार जास्तमद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यापाठोपाठ चार चाकी आणि तीन चाकी वाहनचालकांचा नंबर लागतो. या पकडलेल्या वाहन चालकांमध्ये २६ ते ३५ या वयोगटातील तरुणांचा सर्वाधिक आहे.त्याचबरोबर ३६ ते ५० तसेच १८ ते २५ अशी या वयोगटातील मद्यपींची संख्या त्यापाठोपाठ आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेल्या चालकांमध्ये सर्वाधिक १०१ ते ३०० मिली ग्रॅमइतके अल्कोहलचे प्रमाण सापडले. त्यापाठोपाठ मद्यपींमध्ये १०० मिली ग्रॅमपर्यंत अल्कोहलचे प्रमाण आढळून आले.