मेघेच्या एन्ट्रीने भाजपमध्ये धूसफूस : काँग्रेसला हवा नवा चेहराजितेंद्र ढवळे - नागपूर मध्य नागपूरची लढाई लढण्यासाठी कॉँग्रेस असो वा भाजप. दोन्ही पक्षांना यावेळी ‘मध्यम’ मार्ग काढावा लागेल. हा ‘मध्यम’ मार्ग सध्याच्या राजकीय समीकरणामुळे पुढे आला आहे. गतवेळी मध्य नागपूरसाठी कॉँग्रेसच्या वतीने फिल्डिंग लावणारे समीर मेघे (लवकरच भाजपा) आणि माजी आमदार शौकत कुरेशी यांचे चिंरजीव अॅड. आसिफ कुरेशी यांच्या एन्ट्रीमुळे या मतदारसंघातील प्रस्थापितांना तिकीट मिळविताना दमछाक करावी लागेल. काँग्रेस नेते दत्ता मेघे भाजपमध्ये जाणार असल्याने मध्य नागपुरात भाजपातील राजकारण ढवळून निघाले आहे.पश्चिममध्ये जमले नाही तर भाजपच्या तिकिटासाठी मेघे यांच्या चिरंजीवाचा मध्यमध्ये दावा राहील. मग यावेळी विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना डावलणे हा एकच ‘मध्यम’ मार्ग भाजपपुढे राहतो. तसे करणेही भाजपला धोक्याचे आहे. महापालिकेतील भाजपचे सत्ता पक्षनेते प्रवीण दटके यांनीही येथे दंड थोपटले आहे. पक्षात सर्वांना ‘प्रमोशन’ दिले जात असल्याने दटके यांनाही मध्यमध्ये ‘प्रमोशन’ हवे आहे. हिंदी भाषिक उमेदवार येथे द्यावयाचा राहिला तर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचाही पर्याय आहे. हीच स्थिती कॉँग्रेसची आहे. पश्चिममध्ये तिकिटासाठी घमासान झाले तर राज्यमंत्री राजेंद्र मुळक हेसुद्धा मध्यच्या मैदानात येऊ शकतात. मुळक यांना मात्र पश्चिम कधीही सेफ राहील. इकडे राज्य वक्फ बोर्डाचा प्रवास करीत अॅड.आसिफ कुरशी यांनी मध्यच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. १९८५ मध्ये काँग्रेस पक्षाचे शौकत कुरेशी यांनी २४ हजार ९२७ मते मिळवीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वसंत पारशिवनीकर यांचा पराभव केला होता. त्यावेळी दोन्ही काँग्रेसमध्ये लढत होती. यावेळी अॅड. आसिफ यांनी काँग्रेसकडे दावेदारी केली आहे. अलीकडेच विधान परिषदेवर नियुक्त झालेल्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या पहिल्या यादीत अॅड. आसिफ यांचे नाव होते. अखेरच्या क्षणी त्यांचे नाव मागे पडले ! त्यामुळे आता त्यांच्या आशा बळावल्या आहेत. इकडे मतदारसंघात यावेळी नवा चेहरा देण्याची मागणी काँग्रेस मधूनच पुढे आली आहे. गतवेळचे डॉ. राजू देवघरे यांना थांबवीत येथे काँग्रेसला ‘मध्यम’ मार्ग काढावा लागेल! २००९ मध्ये पश्चिम नागपुरातून नशीब अजमाविणारे अनिस अहमद यावेळी मध्यच्या लढाईत उतरण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेत आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी मध्य नागपुरात ९ हजार ८३५ मते घेतली. मुस्लीम मते यावेळी आपकडे वळली. त्यामुळे विधानसभेत येथे आप मैदानात राहू शकते. बसपा येथे उमेदवार देताना नेहमीच ‘मध्यम’ मार्ग काढत आली आहे. गेल्यावेळी बसपाने येथे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान यांना मैदानात उतरविले होते. खान २४ हजार ३४ मते मिळवीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यावेळी मात्र भाजप बंडखोर बसपाच्या हत्तीवर मध्यमध्ये स्वार होण्याची शक्यता नाकारता येत नाही!या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात मुस्लीम आणि हलबा समाजाचा प्रभाव आहे. हलबा समाज लोकसभेत भाजपच्या बाजूने उभा राहिला. इकडे गेल्यावेळी अपक्ष असलेल्या अॅड.नंदा पराते यांनीही यावेळी तयारी चालविली आहे. पराते यांना ४ हजार ९३९ मते मिळाली होती.काँग्रेसच्या पारंपरिक मतांमध्ये ‘आप’ने केव्हा घुसखोरी केली हे काँग्रेस नेत्यांना कळलेच नाही. मुस्लीम मते ‘आप’कडे वळावी यासाठी भाजपकडूनही प्रयत्न झाले. यातून सावरण्याची संधी काँग्रेसला मिळाली नाही. भाजपविषयी नाराजी असतानाही नितीन गडकरी यांना ३९ हजाराचे मताधिक्य मिळाले. काँग्रेसचे विलास मुत्तेमवार यांना ५४ हजार २१५ मतावर थांबावे लागले. काँग्रेसचे पोल पंडित मध्यमध्ये चुकले! गडकरी यांनी ९४ हजार १६२ मते मिळवीत पहिल्यांदा मध्यमध्ये भाजपला ‘अच्छे दिन’ आणले. इकडे मुस्लिमांच्या मतपरिवर्तनाचा काँग्रेस श्रेष्ठीने गांभीर्याने विचार केला नाही तर विधानसभा निवडणुकीसाठी ही धोक्याची घंटा आहे. १९९० मध्ये जनता दलाचे डॉ. यशवंत बाजीराव यांनी काँग्रेसचे अनिस अहमद यांना पराभूत केले होते. अहमद यांना २२ हजार ३१७ तर डॉ. यशवंत बाजीराव यांना २२ हजार ३२३ मते पडली होती. राज्यात सर्वात कमी मतांनी काँग्रेसचा पराभव होण्याचे हे पहिलेच उदाहरण होय !
कोण काढणार ‘मध्यम’ मार्ग ?
By admin | Updated: June 13, 2014 01:29 IST