महाबळेश्वरला पर्यटकांची अक्षरश: रीघ लागली असून, गुलाबी थंडीत, आल्हाददायक वातावरणात नववर्षाचे स्वागत करू इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी राजस्थानी नृत्य, जादूचे खेळ, आॅर्केस्ट्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यासह राज्याबाहेरून ‘व्हीआयपी’ लोकही मोठ्या संख्येने महाबळेश्वरात दाखल झाले असून, मंगळवारी दिवसभर हेलिकॉप्टरची घरघर सुरू होती. ‘व्हीआयपीं’चा मुक्काम असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वेण्णा लेकवर नौकाविहाराचा आनंद घेतानाच चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठीही झुंबड उडत आहे. व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनी विद्युत रोषणाई करताना नानाविध कल्पनांचे आविष्कार घडविले आहेत. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्वेटर, जॅकेट, टोपी, शाल खरेदी करण्याकडे पर्यटकांचा कल आहे. प्रसिद्ध स्ट्रॉबेरी जाम, जेली, सिरप, चिक्कीबरोबरच गरमागरम कणसे, पॅटीसवर पर्यटक ताव मारत आहेत. जोडीला घोडेस्वारीचा आनंदही लुटत आहेत.महाबळेश्वरात प्रशासन सज्जपर्यटकांसह सहलींची संख्याही वाढल्याने महाबळेश्वरात ‘आॅनलाइन बुकिंग’चा फंडा पर्यटक वापरत आहेत. स्थानिक प्रशासनाने नौकाविहारासाठी अधिक वेळ वेण्णा लेक खुला ठेवण्याची घोषणा केली आहे. वाहतुकीची कोंडी टळावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ३५ पोलीस व दोन अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे, अशी माहिती निरीक्षक प्रकाश सावंत यांनी दिली. वाहनांची तपासणी करून मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. डीजे, आॅर्केस्ट्राला रात्री बारापर्यंत अनुमती देण्यात आली असून, भोजनाची वेळ पहाटे पाचपर्यंत वाढविण्यात आली आहे. ‘हटके’ ठिकाणांचा शोधठराविक पर्यटनस्थळे सोडून वेगळी ठिकाणे शोधण्याचा ध्यास पर्यटकांनी आता घेतला आहे. त्यामुळेच तापोळा, पाली, बामणोली, तेटली अशा गावांमध्येही पर्यटन बहरले असून, अशा ठिकाणच्या हॉटेलचालकांनीही ३१ डिसेंबरला आॅर्केस्ट्रा आयोजित केले आहेत. काही ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत. महाबळेश्वर, वाईमध्ये पोलीस राहणार सतर्कसातारा : ३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात सर्व हॉटेल्स मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे खवय्यांची चंगळ होणार असलीतरी पोलिसांवरील अतिरिक्त ताण मात्र वाढणार आहे. महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई येथे पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.जिल्हा विशेष शाखेतून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर, पाचगणी येथे येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता पोलीस दल सज्ज झाले आहे. दरम्यान, २ ते ८ जानेवारी उन्नत दिन आहे. दि. ३ रोजी पंतप्रधान कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दि. ४ रोजी ईद आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पोलीस दलावरील अतिरिक्त ताण वाढणार आहे. (प्रतिनिधी)आज रात्री उजळणार वर्धनगड...पुसेगाव : स्वराज्याचे प्रवेशद्वार असलेल्या वर्धनगडावर दीपोत्सव व मशाली पेटवून नववर्षारंभ साजरा करण्यात येणार आहे. खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचे प्रवेशद्वार होता. ३५० वर्षापूर्वीच्या गडावरील इतिहासाच्या पुसत चाललेल्या खुणा पुन्हा जाग्या करण्यासाठीच वर्धनगड गाव व किल्ला शिवसेनेचे जिल्हासंपर्कमंत्री नितीन भानुगडे पाटील यांनी दत्तक घेतले आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवर दि. ३१ रोजी मशाली पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.प्राचीन काळात या किल्ल्यावर असणारे पण काळाच्या ओघात गडावर जमिनीखाली गेलेले महाल, कक्ष, भुयारी मार्ग, चोरट्या वाटा, अन्नधान्य कोठार व दारूगोळा साठ्याचे भांडार असण्याची शक्यता आहे. म्हणूनच या गडाच्या संवर्धन व उत्खननासाठी प्रयत्न करणार, असा विश्वास प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.यावेळी सरपंच अर्जुन मोहिते, विठ्ठल सावंत, अर्जुन कुंभार, रहेमान भालदार, पांडुरंग फडतरे, किशोर घोरपडे, संभाजी जाधव, मनीष कदम, संतोष कदम, विकास जाधव, वसंत फडतरे, रमेश कुंभार, तुकाराम चव्हाण, सचिन सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.कोयनानगर बहरलेकोयनानगर येथे गेल्या दोन दिवसांपासून पर्यटकांची गर्दी झाली असून, हॉटेल आणि रिसॉर्ट्सचे बुकिंग झाले आहे. या ठिकाणी शांततेत, निसर्गाच्या सान्निध्यात नववर्षाचे स्वागत करू इच्छिणाऱ्यांनी येथे गर्दी केली आहे. नेहरू उद्यान, कोयना अभयारण्य, धरण परिसर येथे पर्यटकांची गर्दी दिसत आहे.‘हटके’ उपक्रमांचा ध्यासनववर्षाचे स्वागत करताना चंगळवादी संस्कृतीला फाटा देऊन वेगळे उपक्रम योजले जात असून, दहशतवादाचा धिक्कार करण्यासाठी साताऱ्यात सायंकाळी ६ वाजता ‘कँडल मार्च’ काढण्यात येणार आहे. तसेच ‘दारू नको, दूध प्या’ उपक्रमात परिवर्तन व्यसनमुक्ती संघटनेतर्फे राजवाड्यावर दूध वाटण्यात येणार आहे.
कुठं शाली तर कुठं मशाली!--गुलाबी हवेत हेलिकॉप्टरची घरघर
By admin | Updated: December 30, 2014 23:25 IST