शिक्षक परिषद : उच्च न्यायालयात जाणारमुंबई : मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याची पुरेशी सोय नसल्याने सीमावर्ती भागांतील ३६ गावांमध्ये मराठी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शिक्षक परिषदेने घेतला आहे.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना पत्र लिहून सीमा भागात तातडीने मराठी शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षक परिषदेचे आमदार रामनाथ मोते यांनी केली आहे. चंद्रपूर, सांगली व नाशिक जिल्ह्यांतील सीमालगतची गावे आंध्र प्रदेश, कर्नाटक व गुजरात राज्यांच्या जवळ आहेत. तेथे गावे, तांडा व वस्तीमध्ये मराठी शाळा सुरू करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांकडून व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत आहे. त्यानुसार सीमा भागातील सुमारे ३६ गावांमध्ये मराठी माध्यमाच्या नवीन माध्यमिक शाळा विशेष बाब म्हणून अनुदान तत्त्वावर सुरू करण्यास मान्यता दिली होती, मात्र अद्याप अंमलबजावणी झाली नाही. (प्रतिनिधी)
सीमा भागातील मराठी शाळांना मुहूर्त कधी?
By admin | Updated: February 15, 2016 03:55 IST