कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभागांची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पदांचे नामकरण होणार असून ते आता ‘सहायक आयुक्त’ होतील. शनिवार (२० फेब्रुवारी) च्या महासभेसाठी पदनामबदलाचा प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आला आहे. कामकाजात सुसूत्रता आणणे आणि उद्भवणाऱ्या समस्यांचे विहित कालावधीत निराकरण करणे, या अनुषंगाने हा बदल सुचवण्यात आला आहे. केडीएमसी क्षेत्रात अ, ब, क, ड, फ, ग, ह, ई असे आठ प्रभाग आहेत. या प्रभाग कार्यालयांकडील दैनंदिन प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या वतीने प्रभागक्षेत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रभाग अधिकारी म्हणून ८ पदे मंजूर असल्याचे सांगितले जात असले तरी आजच्या घडीला लहू वाघमारे, अरुण वानखेडे आणि शांतिलाल राठोड या प्रभाग अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य प्रभाग अधिकारी ‘प्रभारी’ आहेत. तर, सहायक आयुक्त म्हणून काहींना मंजुरी मिळाली असली तरी कलम ४५ अन्वये शासनाची अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही. दरम्यान, शासनाकडून प्रतिनियुक्तीवर दाखल झालेले संजय शिंदे आणि मिलिंद धाट हे दोघे सहायक आयुक्त म्हणून केडीएमसीत कार्यरत आहेत. शनिवारच्या महासभेत प्रभाग अधिकारी या पदनामाऐवजी ‘सहायक आयुक्त’ असा बदल करण्यास मंजुरी मिळण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. यामुळे प्रभाग स्तरावरील कामकाजात अधिकाधिक सुसूत्रता आणणे व उद्भवणाऱ्या समस्यांचे विहित कालावधीत निराकरण करून लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टिकोनातून प्रभाग स्तरावर नियुक्त अधिकाऱ्यांच्या पदनामात बदल करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. २८ सप्टेंबर २०१५च्या स्थायी समितीच्या सभेत पदनामबदल करण्याचा ठराव मंजूर झाल्याचेही दाखल केलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
प्रभाग अधिकारी होणार आता सहायक आयुक्त
By admin | Updated: February 15, 2016 03:53 IST