शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

विजयचा ‘डबल धमाका’!

By admin | Updated: January 11, 2016 11:54 IST

गतविजेता आणि अनुभवी मल्ल जळगावचा विजय चौधरी याने निर्णायक लढतीत पूर्व मुंबईच्या विक्रांत जाधव याला चारीमुंड्या चित करीत दुसऱ्यांदा मानाचा‘ महाराष्ट्र केसरी’ सन्मान राखला.

नागपूर : गतविजेता आणि अनुभवी मल्ल जळगावचा विजय चौधरी याने निर्णायक लढतीत पूर्व मुंबईच्या विक्रांत जाधव याला चारीमुंड्या चित करीत दुसऱ्यांदा मानाचा‘ महाराष्ट्र केसरी’ सन्मान राखला. ‘डबल महाराष्ट्र केसरी’ बनलेला विजय सहावा मल्ल ठरला आहे.स्थानिक चिटणीस पार्कवर २० हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी झालेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोच रोहित पटेल याचा शिष्य असलेला विजय गतवर्षी अहमदनगरमध्ये पटकविलेल्या पहिल्या किताबाचा बचाव करीत सुरुवातीपासून आक्रमक खेळला. प्रतिस्पर्धी विक्रांत जाधवच्या नकारात्मक वृत्तीचा लाभ म्हणून त्याला एक गुण मिळाला. याचा लाभ उठवीत विजयने लगेचच एकेरी पट काढून आणखी दोन गुण मिळविल्याने पहिल्या तीन मिनिटांत त्याला ३-० अशी आघाडी मिळाली होती. पुढच्या टप्प्यात अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांचा शिष्य असलेल्या विक्रांतने ‘भारंदाज’ डाव टाकून आधी दोन गुण काढले. पण नंतर विजयला विक्रांतच्या निष्क्रियतेचा लाभ मिळताच आणखी एका गुणाची कमाई झाली. महिनाभरापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेच्या चाचणीत विजय चौधरीला धूळ चारणाऱ्या विक्रांतनेदेखील एक गुण संपादन करताच विजयचे चार, तर विक्रांतचे तीन गुण होते. या वेळी अखेरचे ३० सेकंद शिल्लक असताना विक्रांतने फ्रंटकडून ‘सालटो’डाव टाकण्याचा प्रयत्न केला. विजयने हा डाव विक्रांतवर उलटवीत त्याला थेट चित करताच स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला.या जेतेपदाबद्दल चाळीसगावच्या सायगाव पगडीचा रहिवासी असलेल्या विजयला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मामासाहेब मोहोळ स्मृती दीड किलो वजनाची चांदीची आकर्षक गदा आणि एक लाख रुपये रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेता ठरलेल्या विक्रांतला ५० हजार रुपये रोख आणि चषक देण्यात आला.(क्रीडा प्रतिनिधी)‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्याला पोलीस खात्यात थेट नोकरीनागपूर : कुस्तीतील मानाचा ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकविणाऱ्या मल्लास यापुढे पोलीस खात्यात थेट नोकरी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ५९व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोपप्रसंगी केली.स्थानिक चिटणीस पार्कवर आयोजित या स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपास्थितीत झाला. राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी आहे , अशी ग्वाही देत या मल्लांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘कुस्तीला राजाश्रय देण्यात यावा ही जुनी मागणी आहे. या मागणीला होकार देत महाराष्ट्र केसरी विजेत्याला पोलीस खात्यात सामावून घेण्याचे ठरविले आहे. नेमके कुठले पद दिले जाईल ते तपासून पाहावे लागेल, पण पोलीस दलात चांगल्या पदावर विजेत्याला नोकरी देऊ.’’खेळाबद्दल शासन सकारात्मक असले पाहिजे, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘खेळाला राजमान्यता असली पाहिजे अशी आपली भूमिका आहे. पण चित्र विपरित आहे. राज्य शासनाचे पुरस्कार वेळेवर दिले जात नाहीत. खाशाबा जाधव कुस्तीचे आयोजनदेखील दोन वर्षांपासून झालेले नाही. यापुढे हे चित्र बदलावे लागेल. वेळेवर पुरस्कार व आयोजन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करणार आहे.’’या वेळी व्यासपीठावर पालकमंत्री व आयोजन समिती अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. कृपाल तुमाने, खा. रामदास तडस, महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. समीर मेघे, आ. सुधाकर देशमुख, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. गिरीश व्यास, आ. डॉ. आशिष देशमुख, आ. महेश लांडगे, जि. प. अध्यक्षा निशा सावरकर यांच्यासह कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.याआधी पालकंमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रास्ताविक केले. राज्य कुस्ती संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी मनोगत मांडले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठी चित्रपट ‘तालिम’च्या ध्वनिफितीचे विमोचन करण्यात आले. स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ठरलेला मल्ल केवल भिंगारेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २१ हजारांचा रोख पुरस्कार देण्यात आला. भारतीय कुस्ती पथकाचे व्यवस्थापक विलास कथुरे यांचाही सत्कार झाला. लांडगे यांनी म. रा. कुस्तीगीर परिषदेच्या सहयोगी उपाध्यक्षपदी गणेश कोहळे यांची नियुक्ती जाहीर केली. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुस्तीला सुरुवात झाली. (क्रीडा प्रतिनिधी)सोलापूर, कोल्हापूर जिल्हा ‘चॅम्पियन’नागपूर : माती विभागात सोलापूर जिल्हा आणि गादी विभागात कोल्हापूर जिल्हा संघाने येथे रविवारी संपलेल्या ५९ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपदाचा मान मिळविला. अहमदनगरचा केवल भिंगारे हा स्पर्धेत सर्वोत्कृष्ट मल्ल ठरला.माती गटात सोलापूरला सर्वाधिक १७ गुणांसह पहिले आणि पुणे जिल्ह्याला १३ गुणांसह दुसरे स्थान मिळाले. लातूर संघ तिसऱ्या स्थानी राहिला. गादी गटात कोल्हापूर अव्वल, अहमदनगर दुसऱ्या तर पुणे संघ तिसऱ्या स्थानी राहिला. अंतिम लढतीत गादीच्या ७० किलो गटात रमेश कुकडे नाशिक जिल्हा, स्वप्निल पाटोळे पुणे शहर, किरण जवळगे उस्मानाबाद आणि कुमार शेलार कोल्हापूर, ८७ किलोमध्ये विक्रम शेट्ये नगर, कोल्हापूर शहरचे अनिरुद्ध पाटील व संग्राम पाटील तसेच प्रकाश नरोटे कोल्हापूर जिल्हा, ९७ किलोमध्ये विक्रांत वडतिले नांदेड, संतोष गायकवाड नगर, शैलेश शेळके लातूर आणि संग्राम पाटील मुंबई उपनगर यांनी पहिल्या चार स्थानांवर नाव कोरले. माती गटात ७० किलोमध्ये अशफाक शाह औरंगाबाद, विकास बंडगर सोलापूर, बाबासाहेब डोंबाळे पुणे जिल्हा, ८६ किलोमध्ये दत्ता नरळे सोलापूर जिल्हा, नासीर सय्यद बीड आणि हर्षवर्धन थोरात सांगली, ९७ किलोमध्ये तेजस वांजळे पुणे शहर, शुभम शिदनाळे कोल्हापूर जिल्हा व तानाजी झिंजुरके पुणे जिल्हा यांनी बाजी मारली.(क्रीडा प्रतिनिधी)जाधव, चौधरी यांना १२५ किलो गटात सुवर्णचुरशीच्या लढतीत विक्रांतकडून महेश १७-१० गुणांनी पराभूतसकाळी महाराष्ट्र केसरी गटात १२५ किलो वजन गटात गादीवरील अंतिम लढतीत मुंबई पूर्वच्या विक्रांत जाधव याने पूर्ण सहा मिनिटे रंगलेल्या चुरशीच्या चढाओढीत पुणे शहरचा महेश मोहोळ याला १७ विरुद्ध १० अशा गुणफरकाने पराभूत करीत सुवर्ण जिंकले. दोन्ही मल्लांच्या असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत सुरुवातीला चार गुण महेशने मिळविले. पण लगेच सावरलेल्या विक्रांतने आधी चार व नंतर सहा गुण मिळवित दहा गुण घेत पहिल्या फेरीत आघाडी मिळविली. दुसऱ्या फेरीत महेशच्या तुलनेत विक्रांतचे पारडे जड राहिले. दोनदा तर महेश त्याच्याकडून चीत होता होता बचावला. पण विक्रांतच्या गुणात भर पडत गेल्याने अखेरची शिटी वाजली तेव्हा विक्रांत १७ विरुद्ध महेश १० असा गुणफलक होता. लढतीदरम्यान दोन्ही गटांकडून वारंवार आक्षेपही नोंदविण्यात आले होते.बाला रफिकवर विजयची मुसंडीमाती गटात गतमहाराष्ट्र केसरी जळगावच्या विजय चौधरीने सोलापूरच्या बाला रफिक शेख याला सव्वादोन मिनिटांच्या थरारक लढतीत चीत केले. विजयने पहिल्या दोन मिनिटांत पट काढून बाला रफिकला खाली घेतले. अ‍ॅक्शनमध्ये असताना बालानेदेखील विजयला खाली खेचले. त्यावर विजयने गदालोट मारून डावा काढला, तसेच पुन्हा दोन गुणांची कमाई केली. याच स्थितीत बाला रफिकने विजयला चीत करण्याचा प्रयत्न केला, पण बाजी विजयने त्याच्यावरच उलटवित चीत केले.साताऱ्याचे कोच वर्षभरासाठी निलंबितकुस्ती हौदात येऊन पंच आणि सामनाधिकाऱ्यांसोबत बाचाबाची करणारे साताऱ्याचे कोच सुनील लिम्हण यांना वर्षभरासाठी निलंबित करण्याचा निर्णय शनिवारी रात्री झालेल्या राज्य कुस्ती परिषदेच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. ही माहिती उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘जळगावचा विजय चौधरी याच्याविरुद्ध १२५ किलो वजन गटात माती विभागात लिम्हण यांचे शिष्य किरण भगत हा कुस्ती हरला. पंचांच्या निर्णयावर लिम्हण समाधानी नव्हते. त्यांनी हौदात प्रवेश करीत गोंधळ घातला होता. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्याची मागणी केली. पण सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी वर्षभरासाठी बंदी लावण्याची घोषणा केली. लिम्हण पुढील जानेवारीपर्यंत कुठल्याही मल्लाला कोचिंग करणार नाहीत, शिवाय कुस्ती स्पर्धास्थळी दिसणार नाहीत, असा ठराव संमत करण्यात आला. विजय हा दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणे ही आमच्यासाठीच नव्हे तर गिरणा परिसर आणि जळगाव जिल्ह्यासाठीही मोठी अभिमानाची बाब आहे. बालपणी त्याला क्रिकेट आणि कुस्तीची आवड होती. मात्र नंतर तो कुस्तीकडे वळला. त्याला अनेकवेळा दंगलींसाठी घेऊन जात असे. पुण्यात त्याचे कौशल्य वाढले. त्याच्या मेहनतीचे हे फळ आहे. असेच यश नेहमी त्याला मिळो हीच अपेक्षा. - नथू भिका चौधरी, उपसरपंच, सायगाव व विजयचे वडीलमाझा विजूदादा दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झाला. हा खरोखरच आनंदाचा दिवस आहे. हा आनंद फक्त आम्हालाच नाही तर गावासह जिल्ह्यालाही आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानुसार त्याला पोलिसात नोकरीही मिळणार आहे. त्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला आहे. तो याहीपेक्षा पुढे जाईल यात शंका नाही.- रंजना नथू चौधरी, विजयची आई