ऑनलाइन लोकमत
लोणंद ( सातारा), दि. ८ - खंडाळा तालुक्यातील बोरी अन् सुखेड या गावच्या दरम्यान असलेल्या ओढ्यात दरवर्षी नागपंचमीच्या दुस-या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. दोन्ही गावातील महिला समोरासमोर येऊन एकमेकींना खालच्या पातळीवर जाऊन शिव्या देण्याची परंपरा आहे. मात्र, बदलत्या काळानुसार शिव्यांची पद्धत मागे पडत केवळ कलकलाट ऐकायला मिळतो. यंदाही सोमवारी दुपारी ‘बोरीचा बार’मध्ये रिमझिम पावसात शिव्यांऐवजी कलकलाट ऐकायला मिळाला.
या ओढ्याच्या काठी दोन्ही गावातील महिला दुपारी बारा वाजता मिरवणुकीद्वारे समोरासमोर आल्या. रिमझिम पावसातया ठिकाणी आल्यानंतर हलगीच्या तालावर बोरीचा बार रंगला. मात्र, यंदा ओढ्यात पाणी असल्याने महिलांच्या उत्साहावर पाणी फिरले. केवळ कलकलाटावरच ‘सोहळा साजरा’ झाला.
या ओढ्यात दोन्हीकडच्या महिला प्रततिस्पर्धी गावातील महिलेला ओढत आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या महिलेला ओढत आपल्या हद्दीत आणले जाते, तिला नंतर साडी-चोळीचा आहेर करुन तिची गावातून मिरवणूक काढली जाते. यंदा मात्र, परिसरात चांगला पाऊस असल्याने केवळ नदीच्या काठावर उभे राहून हातवारे करत कलकलाट करावा लागला. त्यानंतर गावात यात्रा भरली. यात्रेनिमित्तााने लहान मुलांसाठी खेळणी, मिठाईची दुकाने थाटली गेली होती.