शिरपूर जैन (जि. वाशिम) : दुष्काळी स्थितीत शासनाकडून मदत मिळत नसल्यामुळे जामदरा गावाने खरीप हंगामावरच बहिष्कार घातल्यानंतर, आता मालेगाव तालुक्यातील वसारी ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला काढले आहे. शेतकऱ्यांनी रविवारी बसस्थानक चौकात गाव विक्रीला काढल्याचे फलक लावून ठिय्या दिला. ‘दुष्काळग्रस्तांना मदत द्या, नाही तर गाव विकत घ्या’ असे फलक गावकऱ्यांनी लावले. फलकावर ‘आमचे आमदार, खासदार कोणी पाहिलेत का?’ असा प्रश्न करीत, त्यांना शोधून देणाऱ्यास दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांकडून दोन रुपये इनाम ठेवण्यात आल्याचे म्हटले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. खा. संजय धोत्रे दहा वर्षांपासून एकदाही गावात आले नाही, तसेच आ. अमित झनकही लग्नप्रसंग सोडले, तर गावातील समस्या ऐकण्यासाठी आले नसल्याचे दामोदर इंगोले यांनी सांगितले. (वार्ताहर)
विदर्भातील वसारी गाव विकणे आहे!
By admin | Updated: April 4, 2016 02:56 IST