ठाणे : मुंबई विद्यापीठाचे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ. संजय देशमुख हे श्रीरंग विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. कुलगुरूपदी निवड झाल्यानंतर त्यांचा पहिलावहिला सत्कार त्यांच्याच शाळेत त्यांच्या शिक्षिका कुमुदिनी बल्लाळ यांच्या हस्ते करण्यात आला. ठाणे येथे होऊ घातलेले मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र अत्यंत चांगले असून, त्याचा दर्जा वाढविण्यासाठी व परिपूर्णतेसाठी आपण नव्या योजना हाती घेणार आहोत, असे देशमुख यांनी या वेळी सांगितले. मुंबई विद्यापीठाची प्रतिमा ढासळली असून, ती सुधारण्यासाठी आपण काय करू इच्छिता? असे विचारले असता ते म्हणाले की, कोणतीही संस्था वाईट नसते. फक्त काही प्रवृत्ती आणि संस्थेकडे बघण्याचा काहींचा दृष्टिकोन हा त्याला जबाबदार असतो. आपल्या कार्यकाळात आपण विद्यापीठाची १५८ वर्षांची परंपरा उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू. आपली निवड ही राजकीय लागेबांध्यांतून झाली आहे काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, गुणवत्ता आणि शैक्षणिक कार्य याआधारे ती झाली आहे. या कार्यक्रमास भाजपा महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा अॅडव्होकेट माधवी नाईक आणि नगरसेवक मिलिंद पाटणकर उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
कुलगुरूंचा सत्कार त्यांच्याच शाळेत
By admin | Updated: June 22, 2015 03:30 IST