ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १ - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक लढवणे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मात्र महाराष्ट्रात यंदा मुख्यमंत्री शिवसेनेचाच म्हणजेच महायुतीचाच होणार असा दावा शिवसेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांचीच इच्छा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून जनतेने कौल दिल्यास मुख्यमंत्रीपदावरही विराजमान होऊ असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरेंच्या या घोषणेवर रविवारी शिवसेना खासदार व पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला कौल पाहता निवडणूक कोणीही लढवल्या, कोणीही आव्हान दिले तरी राज्यात महायुतीचाच विजय होणार. या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंनी विराजमान व्हावे ही महाराष्ट्राच्या जनतेची व शिवसैनिकांची इच्छा असल्याचे सांगत राऊत यांनी मनसेला टोला लगावला आहे.
दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुंबईत शिवसेनेचा विजयी मेळावा असून या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंनीही निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यास विधानसभा निवडणुकीत ठाकरेबंधू प्रथमच आमने सामने येतील.