पुणे : राज्यातील प्रत्येक आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत राज्य शासनाकडून घर बांधून दिले जाणार आहे, त्यानंतर एकही आदिवासी कुटुंब घरापासून वंचित राहणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. यासाठी निधीची तरतूद व इतर सर्व नियोजन झाल्याचेही त्यांनी सांगितले.आदिवासी विभागाच्यावतीने पेसा योजनेची वर्षपूर्ती कार्यक्रमाचे करण्यात आले होते. पेसा योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी बहुल ग्रामपंचायतींना थेट ५ टक्के अनुदानाची रक्कम दिली जात आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही ग्रामपंचायतींना अनुदानाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, अन्नधान्य व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, आदी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, ‘‘पेसाचा निधी हा केवळ पैसा देत नाही तर अधिकार देतो. स्वत:च्या गावात आवश्यक वाटणारी कामे करण्याचा अधिकार यातून मिळतो. मागील वर्षभरात १८० कोटी रूपयांची २३ हजार ८३४ कामे हाती घेण्यात आली आहेत.’’ (प्रतिनिधी)महाराष्ट्रात प्रथम पेसाची अंमलबजावणी पेसा योजनेची यशस्वी अंमलबजावणी महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरल्याचे विष्णू सावरा यांनी सांगितले. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण यावर हा निधी खर्च केला जात आहे. कुपोषण थांबविण्यासाठी अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू केली आहे. वारली कलेला जागतिक स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
आदिवासी कुटुंबाला २०१९ पर्यंत घर देणार
By admin | Updated: May 30, 2016 04:43 IST