आविष्कार देसाई,
अलिबाग, दि. 22 - मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी, वाहनचालक, परिसरातील नागरिक सर्वच त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सव काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे यंदाही खड्डेमय महामार्गावरूनच प्रवास करावा लागणार, अशी भीती प्रवाशांमध्ये होती. मात्र महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याने गणेशभक्तांचा यंदाचा कोकणातील प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे. सुप्रीम इन्फ्रा या कंपनीने खड्डे भरण्याला सुरुवात केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्ग सुस्थितीत होण्याची शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. विविध कारणांनी या कामामध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. त्यामुळे बराच कालावधीपासून या महामार्गाचे काम रखडले आहे. विविध संघटना, राजकीय पक्षांनी महामार्गाचे काम लवकरात लवकर करावे, यासाठी आंदोलने, मोर्चेही काढले होते, तरी सुध्दा महामार्गाचे काम धीम्या गतीनेच सुरु होते. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबई-पुण्यातील मोठ्या संख्येने प्रवासी या मार्गाचा वापर कोकणात जाण्यासाठी करतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरु करुन ते पूर्ण करणे गरजेचे झाले होते. आता खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याने गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होईल.>महामार्गासाठी सात कोटीडांबरीकरण, पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून खड्डे बुजविण्यात येत आहेत. या कामासाठी सुप्रीमला सुमारे सात कोटींचा खर्च येणार आहे. सर्व एजन्सीचे मिळून दीडशेहून अधिक कामगार या कामात गुंतले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सप्टेंबर महिन्यात सुरुवात होणार आहे. निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यात येईल, असे सुप्रीम इन्फ्राचे प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत फेगडे यांनी सांगितले.>84 किलोमीटरच्या महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी सुप्रीमने सहा एजन्सीना कामाला लावले आहे. स्वस्तिक कन्स्ट्रक्शन, स्वामी कन्स्ट्रक्शन, शिवम पेव्हर ब्लॉक, मोनिका कन्स्ट्रक्शन आणि अशोका कन्स्ट्रक्शन कंपनी पळस्पे ते वडखळ या टप्प्यातील खड्डे भरण्याचे काम करीत आहेत, तर वडखळ ते इंदापूर या टप्प्यातील काम सुप्रीम इन्फ्रा आणि आशिष कन्स्ट्रक्शनने हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पावसाळ्यात महामार्गाची परिस्थिती आणखीनच गंभीर होती. मोठमोठे खड्डे पडल्याने तीन तासांच्या अंतरासाठी सुमारे सात तास मोजावे लागत होते. खड्डे आणि वाहतूक कोंडी अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या प्रवाशांना त्यामुळे प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. काही ठिकाणी रूंदीकरणाचे काम सुरू आहे.