नागपूर : कचरा उचलण्यासाठी अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याचा खळबळजनक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. गरिबी आणि बेकारीचा फायदा घेऊन आसाममधील मुलांची तस्करी करण्यात येत आहे. सोलापूरच्या डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी नेण्यात येत असलेल्या सहा आसामी मुलांची नागपुरात सुटका करण्यात आली. या घटनेमुळे मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी दुपारी येथील रेल्वेस्थानकावर आसाममधील १२ ते १७ वयोगटांतील सहा मुले चाइल्ड लाइनच्या समन्वयक गौरी देशपांडे यांना दिसली. देशपांडे यांनी या मुलांची विचारपूस केल्यानंतर त्यांना संशय आला. मुलांसोबतच्या एका युवकाचीही त्यांनी चौकशी केली आणि रेल्वे पोलिसांना त्याची माहिती दिली. पोलिसांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही मुले आसाममधील बोरापट्टा येथील असल्याचे आढळले. मुलांना सोलापूर येथील डम्पिंग यार्डमध्ये कचरा उचलण्यासाठी नेण्यात येत होते. मैतुल इमाम हुसैन (२५) या दलालाच्या माध्यमातून त्यांना सोलापूर येथे पोहोचविण्यात येत होते. प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी बाल संरक्षण अधिनियमांतर्गत रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकास अटक केली व सहाही मुलांना निरीक्षणगृहात पाठविण्यात आले. त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)गरिबी आणि बेकारीमुळे पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलांची तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात आंतरराज्य टोळी सक्रीय आहे. कचरा उचलणे, कारखान्यातील छोटी-मोठी कामे मुलांकडून करून घेण्यात येतात. आम्ही आसामच्या बाल संरक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. - मुस्ताक पठाण, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
आसाममधील बालकांची तस्करी!
By admin | Updated: March 17, 2016 01:44 IST