मयुर गोलेच्छा/लोणार (जि. बुलडाणा) : उल्कापातामुळे तयार झालेल्या खार्या पाण्याच्या सरोवरासह शहरातील पुरातन मंदिरांचे आकर्षण असलेल्या लोणारमध्ये १५ दिवसांपासून पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. मात्र, मूलभूत सुविधांअभावी पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याचे चित्र सध्या दिसून येते. नाताळाच्या सुट्या आणि ३१ डिसेंबर साजरा करण्याचे नियोजन करुन लोणार येथे मोठय़ा संख्येने पर्यटक येतात. परंतु इथे आल्यानंतर थांबण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे संकुल सोडले, तर दुसरे कोणतेही ठिकाण नाही. सध्या पर्यटन विभागाच्या संकुलासह शहरातील विश्रामगृहेही हाऊसफुल्ल झाली आहेत. त्याचप्रमाणे वैज्ञानिक, पौराणिक आणि धार्मिक महत्व असल्यामुळे राज्यभरातील शैक्षणिक संस्थांच्या सहलीही लोणारमध्ये येत आहेत. दिवसभरात १५0 ते २00 पर्यटकांचे आगमन होते. मात्र त्या तुलनेत येथे पर्यटकांची राहण्याची, जेवणाची सुविधा नसल्यामुळे, पर्यटक लगेचच येथून जाण्यास पसंती देतात. जागतिक किर्तीचे अ वर्ग दर्जा प्राप्त पर्यटनस्थळ असलेल्या लोणार येथे पर्यटन व्यवसाय वाढीसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. याकडे शासनाने तात्काळ लक्ष देवून पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याची मागणी पर्यटकांमधून होत आहे. गत दोन दिवसांत लोणार येथे जवळपास ५00 पर्यटकांनी भेट दिली आहे; मात्र पर्यटकांना थांबण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरातील पर्यटन स्थळे पाहून एका दिवसातच त्यांना परतावे लागत आहे. महाराष्ट्र पर्यटन संकुलात १00 पर्यटकांची थांबण्याची व्यवस्था आहे; मात्र ऑनलाईन बुकींगमुळे एमटीडीसी आधीच पर्यटकांनी भरलेले असल्याचे लोणार येथील महाराष्ट्र पर्यटन संकुलाचे संचालक राजेश मापारी यांनी स्पष्ट केले.
सुविधांअभावी पर्यटक परतीच्या मार्गावर!
By admin | Updated: December 30, 2014 00:21 IST