ब्रह्मनंद जाधव / मेहकर (जि. बुलडाणा): मागील तीन वर्षात राज्यात टोमॅटो उत्पादनाचे क्षेत्र ५0 हजार हेक्टरच्यावर पोहचले असून, लागवड क्षेत्रात जवळपास दीड पटीने वाढ झाली. यावर्षी व्यापार्यांनी अतिशय कमी भावात खरेदी केल्यामुळे टोमॅटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील पीक क्षेत्रातील सुमारे २९ हजार ११0 हेक्टर क्षेत्र हे टोमॅटो लागवडीखाली येत होते. गत सहा वर्षात टोमॅटोच्या या क्षेत्रात जवळपास दीड पटीने वाढ होऊन हे क्षेत्र ५0 हजार हेक्टरच्यावर पोहचले आहे. राज्यात सन २00९ मध्ये ७ लाख ३२ हजार, २0१0 मध्ये ११ लाख १२ हजार व २0११ मध्ये ७ लाख ३८ हजार टन टोमॅटोचे उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर टोमॅटोच्या उत्पादनात वाढ होऊन सन २0१२ मध्ये १0 लाख ७ हजार, २0१३ मध्ये १0 लाख ५0 हजार व २0१४ मध्ये १0 लाख ५0 हजार टन टोमॅटो उत्पादन घेण्यात आले. गत तीन वर्षात शेतकर्यांनी मोठय़ा प्रमाणावर टोमॅटो उत्पादन घेतले. यावर्षी टोमॅटोच्या भावात मोठी घसरण होत आहे. बाजारपेठेत टोमॅटोचे भाव प्रती किलो ५ रुपये मिळणेही अवघड झाले आहे. व्यापारी मात्र १५ ते २0 रुपये किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. गत काही दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण असून, वातावरणातील या बदलाने काही भागात टोमॅटोवर रोगाचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. बाजारातही अडते व व्यापार्यांचे साटेलोटे असल्याने टोमॅटोला अपेक्षित भाव मिळत नाही. त्याचप्रमाणे तोडणी, दलाली व दळणवळणाचा खर्चदेखील मोठय़ा प्रमाणात असल्याने भाजीपाला उत्पादन तोट्यात आहे.
टोमॅटो लागवड क्षेत्रात दीड पटीने वाढ!
By admin | Updated: August 31, 2015 01:20 IST