शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

सौदागर नागनाथ गोरे ऊर्फ छोटा गंधर्व यांचा आज स्मृतिदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2016 11:01 IST

मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या बालमोहन संगीत मंडळीचे मालक दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली

 - प्रफुल्ल गायकवाड

मुंबई, दि. 31 - मराठी रंगभूमीवरील नामवंत गायक नट. 'छोटा गंधर्व' ह्या नावाने विशेष परिचित. संपूर्ण नाव सौदागर नागनाथ गोरे. जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव जवळच्या भाडळी या गावी. त्यांचे औपचारिक शिक्षण फारसे झाले नाही. मराठी रंगभूमीच्या इतिहासात बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या बालमोहन संगीत मंडळीचे मालक दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी सौदागरांना, तसेच त्यांचा धाकटा भाऊ पितांबर ह्याला आपल्या कंपनीत आणले. 'बालमोहन संगीत मंडळी'ने रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात हा प्रयोग झाला (२२ जुलै १९२८). सौदागरांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या गंधर्वतुल्य आवाजामुळे दामूअण्णांनी आपल्या संस्थेतर्फे होणाऱ्या नाट्यप्रयोगांच्या जाहिरातींत सौदागरांचा उल्लेख 'छोटा गंधर्व' असा करण्यास सुरुवात केली आणि नंतर हेच नाव रूढ झाले. 'बालमोहन'च्या अन्य काही नाटकांत कामे केल्यानंतर, ह्या संस्थेने सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायिलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून 'वन्स मोअर' मिळत. संगीतकलेत सौदागरांची अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून दामूअण्णांनी सौदागरांना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळेल, अशी व्यवस्था केली. वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक पाध्येबुवा ह्यांनी त्यांना आरंभी गाणे शिकवले. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम मिळाली. कृष्णराव गोेरे, कृष्णराव शेंडे, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे उत्कृष्ट गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणे शिकले. अनेकांच्या गायकीचे अनुभव व संस्कार लाभल्यामुळे जेथे जे चांगले गवसेल, ते घेऊन आपल्या स्वतःच्या गायकीचे सुंदर रसायन त्यांना घडविता आले.
 
नाटकाच्या व्यवसायाला १९३२-३३ च्या सुमारास वाईट दिवस आले होते आणि 'बालमोहन संगीत मंडळी'लाही ह्या परिस्थितीची झळ लागू लागली होती. तथापि आचार्य अत्र्यांसारखा प्रभावी नाटककार ह्या संस्थेच्या मागे उभा राहिल्यामुळे ही संस्था त्या आपत्तीतून बचावली. अत्र्यांचे पहिले नाटक साष्टांग नमस्कार 'बालमोहन'ने १९३३ साली रंगभूमीवर आणले. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्या नाटकात सौदागरांनी नायिकेची-त्रिपुरीची- भूमिका केली. त्यानंतरच्या घराबाहेर (प्रथम प्रयोग १९३४) ह्या अत्रेकृत नाटकातील पन्दाभाच्या भूमिकेपासून त्यांनी स्त्रीभूमिका करणे सोडून देऊन नायकाच्या भूमिका करावयास आरंभ केला. साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर नंतर भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी (१९३६), उद्याचा संसार (१९३६), वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके 'बालमोहन'ने रंगभूमीवर आणली. ह्यात संस्थेला आर्थिक लाभाबरोबरच जी कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळाली, ती मिळविण्यात सौदागरांचा वाटा मोठा होता. तथापि मी उभा आहे ह्या नाटकानंतर अत्रे अन्य क्षेत्रांत मग्न झाल्यामुळे 'बालमोहन'चा एक मोठा आधार तुटला आणि संस्था चालवणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले. त्यामुळे 'बालमोहन'मधल्या काही प्रमुख नटांनी १९४३ मध्ये 'कला-विकास' ही नवी संस्था काढली. त्यांच्यांत सौदागरही होते. ह्या संस्थेतर्फे नाटककार नागेश जोशी ह्यांची फुलपाखरे, मैलाचा दगड, देवमाणूस, विजय ही नाटके सादर केली जाऊ लागली. त्यांतील मुख्य भूमिकांची आणि संगीताची बाजूही त्यांंनी सांभाळली. ह्या संस्थेच्या नाटकांची पदेही देवमाणूस पासून सौदागर स्वतः लिहू लागले. ह्या नाटकातील 'चांद माझा हा हसरा' हे गाणे खूप लोकप्रिय झाले. 'कला-विकास' ही कालांतराने बंद पडल्यानंतर 'भारत नाट्यकला' ह्या संस्थेच्या सौभद्र (कृष्ण), विद्याहरण (कच), मानापमान (धैर्यधर) ह्या नाटकांतून त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या. त्यांची कृष्णाची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. १९५१ नंतर ते ठेकेदारांनी करविलेल्या नाट्यप्रयोगांतून 'नाइट'वर कामे करू लागले. नाइट म्हणजे नटाला दर प्रयोगाला दिले जाणारे मानधन. त्या काळात छोटा गंधर्व संगीत नाटकाकरिता सर्वांत जास्त म्हणजे रु. १०००/- नाइट घेत असत. सौभद्र, विद्याहरण, मानापमान, मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ ह्या नाटकांतूनच त्यांनी पंचविसांहून अधिक वर्षे प्रमुख भूमिका केल्या.
 
सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणे ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे 'स्वरराज छोटा गंधर्व' हे मानाभिधान त्यांना लाभले.
 
विद्याधर गोखले ह्यांच्या सुवर्णतुला (प्रथम प्रयोग-१० ऑक्टोबर १९६०) ह्या नाटकात त्यांनी काम केले होते आणि त्यातील पदांना संगीतही दिले होते.
 
नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक असून संगीतातील सर्व प्रकारचे सौंदर्य नेमकेपणाने टिपता आले पाहिजे; नाटकातील पदाचा आरंभ आणि त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे; नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना करू नये; प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत सहजपणे भिडतील अशा संगीतरचना कराव्या, अशी त्यांची मते होती.
 
त्यांच्याबरोबर संशयकल्लोळमध्ये रेवतीची भूमिका करणाज्या इंदू मुळपुळे ह्यांच्याशी त्यांनी १९३७ साली विवाह केला.
 
मुंबईत १९८० साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.